Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 13 March, 2008

...तर सरकार टिकणार नाही

मडकईकरांच्या कार्यकर्त्यांचा इशारा
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): बहुजन समाजाला डिवचून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपली खुर्ची सांभाळण्याचा जर प्रयत्न चालवला असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत. पांडुरंग मडकईकर यांना पुन्हा सन्मानाने मंत्रिपदी बसवले नाही तर हे सरकार अजिबात टिकणार नाही,असा गर्भित इशारा कुंभारजुवे मतदारसंघातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत देण्यात आला.
आज जुने गोवे पंचायत सभागृहात आयोजित खास जाहीर सभेत कुंभारजुवे मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी पांडुरंग मडकईकर यांचे मंत्रिपद काढून घेतल्याबद्दल मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा निषेध केला. जोपर्यंत ते मडकईकर यांना पुन्हा मंत्रिपदी आरूढ करीत नाहीत तोपर्यंत त्यांनी या मतदारसंघात पाय ठेवू नये. यापुढे त्यांना राज्यात सर्वत्र काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
येत्या शनिवार १५ रोजी जुने गोवे येथील गांधी चौकाजवळ भव्य जाहीर सभा आयोजित केली जाणार आहे. मडकईकर यांचे राज्यभरातील सर्व समर्थक तथा हितचिंतक या बैठकीला उपस्थित राहणार असून शक्तीप्रदर्शनच घडवून आणणार असल्याची घोषणा पक्षाचे पदाधिकारी तथा प्रदेश कॉंग्रेसचे सदस्य मारीयो पिंटो यांनी जाहीर केले. भाजप सरकार सत्तेवर असताना माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कॉंग्रेसच्या एका नेत्याला तुरुंगात टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. यावेळी सदर नेत्याने खटपटीवरून पर्रीकर यांचे सरकार पाडले. याकाळात मडकईकर निःस्वार्थीपणाने कॉंग्रेसमध्ये गेले परंतु "पेटी" च्या आशेने कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले दिगंबर कामत यांना कॉंग्रेसच्या तत्त्वांची काहीही माहिती नाही, असा ठपका श्री.पिंटो यांनी ठेवला. आपली खुर्ची सांभाळण्यासाठी त्यांनी जो खेळ चालवला आहे, तो कोणताही स्वाभिमानी नेता खपवून घेणार नव्हता. मडकईकरांचे मंत्रिपद काढून घेणे ही फक्त सुरुवात आहे. यापुढे अर्थसंकल्पानंतर वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांच्याकडील वित्त खाते काढून घेणे, रवी नाईक यांना संपवणे आदी अनेक डाव आघाडीतील तथाकथित गटाने आखल्याचा आरोप त्यांनी केला. दोन वेळा दिगंबर कामत यांना पाडण्यासाठी पुढे सरसावलेल्या सुदिन ढवळीकर यांना अशाप्रकारे आपल्या पक्षाच्या नेत्याचा बळी देऊन सन्मानाने खुर्चीवर बसवण्याची कृती हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असा आरोप करून दिगंबर यांना खरोखरच स्वाभिमान असेल तर ते सरकारच बरखास्त करून नव्याने निवडणुकीला सामोरे जाणार, अशीही पुस्ती जोडण्यात आली.
राज्यातील कॉंग्रेस नेते पक्षाच्या नावावर धंदा करीत आहेत. भाजपवर जातीयवादाचे आरोप करून लोकांना फसवून कॉंग्रेस नेते आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. प्रत्येक गोष्टीवर "हायकमांड' असा उल्लेख करणाऱ्या कामत यांनी ही जबाबदारी श्रेष्ठींवरच सोपवावी असाही टोमणा श्री.पिंटो यांनी हाणला.
दिगंबर कामत यांच्याकडे निर्णय क्षमता अजिबात नाही हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. गृह व वित्त खाते त्यांना न देण्यामागचे हेच मुख्य कारण असल्याचे सांगून असा मुख्यमंत्री अजिबात नको,अशी टीका विल्सन फर्नांडिस यांनी केली. कॉंग्रेसचे काही नेते सध्या पक्ष संपवण्यास पुढे सरसावलेले असून त्यांना वेळीच ठेचण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त झाले. सभेला मतदारसंघातील अनेक प्रमुख कार्यकर्ते तथा पदाधिकारी हजर होते. त्यात माजी आमदार कृष्णा कुट्टीकर, कुंभारजुवा मतदारसंघ गटाध्यक्ष अवधूत नाईक,चोडणचे सरपंच प्रसाद चोडणकर,प्रदेश कॉंग्रेस सदस्य बॅनी,सेवा दलाचे प्रसाद धुळापकर आदी उपस्थित होते.

No comments: