Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 13 March, 2008

पंडित प्रभूदेव सरदार यांचे निधन

शास्त्रीय संगीत परंपरेतील तारा निखळला
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): "विलोपले मधूमिलनात या' हे नाट्यगीत अजरामर करणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायक पंडित प्रभूदेव सरदार यांचे आज (गुरुवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांच्या घरी ह्रदयविकाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
आपल्या घरी एका विद्यार्थ्याला हार्मोनियम घेऊन राग "मियॉं मल्हार' शिकवत असताना त्यांचे अंग दुखू लागले. त्यामुळे ते आतील खोलीत गेले ते पुन्हा बाहेर आलेच नाहीत. पं. सरदार यांनी आपल्या मृत्यूनंतर देहदान करण्याची इच्छा व्यक्त केल्याने उद्या (शुक्रवारी) सकाळी ९.३० पर्यंत त्यांचा पार्थिव राहत्या घरी शेवटच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पंडितजींच्या इच्छेनुसार सोलापूर येथील एका इस्पितळात त्यांचे देहदान केले जाणार आहे, अशी माहिती त्यांची पत्नी निर्मला सरदार यांनी दिली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले व सुना असा परिवार आहे. त्यांचा देशविदेशात मोठा रसिकवर्ग आणि शिष्यवर्ग आहे.
२००० साली पं. सरदार कला अकादमीच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विभागाचे संचालक म्हणून रुजू झाले. या काळात त्यांनी गोव्यात अनेकांना गायन कलेत निपुण केले.
१९६२ मध्ये प्रभुदेवांची बदली ज्यावेळी मुंबईला झाली त्यावेळी त्यांनी प्रसिद्ध आग्रा घराण्यातून जगन्नाथबुवा पुरोहित ज्यांनी जोग कंस आणि स्वानंदासारख्या रागांची निर्मिती केली अशा महान गुरूंकडून संगीताचे धडे गिरवण्यास सुरवात केली. त्यांच्याकडे पाच वर्षे संगीताचे धडे गिरवल्यावर पं. प्रभूदेव आपल्या संगीताचा सराव करण्यासाठी पंडित निवृत्तीबुवा सरनाईक (जयपूर) यांच्या नेतृत्वाखाली रियाज करू लागले. वेगवेगवेळ्य संगीत विद्यालयातून संगीत घेतल्यानंतर पंडितजींनी आपली अशी वेगळी गायनशैली निर्माण केली होती.
पं.सरदार आपल्या या गायकीला आग्रा-जयपूर आणि किराणा शैलीची गायकी असे म्हणत. आपल्या गुरूंनी आपल्यावर कोणताही गायकी न लादता कोणतीही गायकीचा अभ्यास स्वतंत्र दिल्याचेही अनेक वेळा ते सांगत होते. त्यांना नेहमीच "कलाकाराने श्रोत्यांना जे आवडले त्याप्रमाणे आपले असे वेगळेपण करावे' असे त्यांना वाटत होते. शेवटी कलाकार हा फक्त रसिकांना आनंद देत असतो.
दरबारी कानडा, मियॉे की मल्हार, मालकंस, ललित आणि तोडी हे त्यांचे आवडीचे राग तर उस्ताद अमीर खान, कुमार गंधर्व, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, हिराबाई बडोदेकर आणि रोशनतारा बेगम या त्यांच्या आवडीचे गायक. उपाशी पोटी कोणतीही साधना होऊ शकत नसल्याने पंडितजींनी संगीताची व्रत म्हणून उपासना केली. त्यांच्या अनेक शिष्यापैंकी श्रीकृष्ण खाडिलकर, सुजन साळकर, श्याम गुंडावर आणि आश्विनी वार्संकर ही मंडळी नावारुपाला आली आहेत.
_________________________________________
मरणोत्तर देहदान
पं. सरदार यांनी आपल्या मृत्यूनंतर देहदान करण्याची इच्छा व्यक्त केल्याने उद्या (शुक्रवारी) सकाळी ९.३० पर्यंत त्यांचा पार्थिव राहत्या घरी शेवटच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पंडितजींच्या इच्छेनुसार सोलापूर येथील एका इस्पितळात त्यांचे देहदान केले जाणार आहे, अशी माहिती त्यांची पत्नी निर्मला सरदार यांनी दिली.
_________________________________________

प्रतिक्रिया
डॉ. पांडुरंग फळदेसाई (कला अकादमी सदस्य सचिव)
पंडितजींच्या निधनामुळे अकादमीचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. अकादमीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य म्हटले पाहिजे. हिंदुस्थानी संगीत विभागाचे संचालक पद सांभाळल्यानंतर त्यांनी अनेक कलाकार घडवले. ते कलाकार म्हणून उत्कृष्ट होते तसेच गुरु म्हणूनही चांगले होते.
------------------
प्रा. कमलाकर नाईक (संगीत महाविद्यालय)
पंडितजी हे हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील एका चांगले उपासक तसेच अभ्यासक होते. त्यामुळे संगीताची हानी झाली आहे. ठुमरी आणि दादरा या गायन प्रकारावर त्यांचा चांगला अधिकार होता. तसेच या गायनशैलीचा त्यांचा दांडगा व्यासंग होता.
--------
पद्मभूषण पं. प्रसाद सावकार
पंडितजी गुणी कलाकार होते. अनेक वर्षे सरकारी वकील म्हणून काम पाहूनही त्यांनी गाणे आत्मसात केले. आम्ही पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडे त्यांच्या साथीत संगीताचे धडे घेत होतो. त्यांचा आवाज अत्यंत गोड होता, तो त्यांनी शेवट पर्यंत टिकवून ठेवला होता. "विलोपले मधूमिलनात या'या नाट्य गीतामुळे ते अधिक प्रसिद्धीस आले.

No comments: