मडगाव, दि. २६ (प्रतिनिधी)
वालंकाम्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांचा कमजोरपणा असून त्यामुळे ते स्वतःबरोबर सरकार व पक्षालाही खड्ड्यात लोटणार असल्याची जी टीका होत आहे त्याची खिल्ली खुद्द त्यांची कन्या वालंका हिनेच आज उडविली. आपण आपल्या वडलांचे खरे बलस्थान असल्याचे सांगून एक ना एक दिवस त्याची प्रचिती सर्वांना येईल, असा दावा तिने केला.
गेल्या शनिवारपासून सुरू झालेल्या गोव्यातील राजकीय नाट्याच्या अखेरच्या दिवशी वडील चर्चिल व काका ज्योकिम यांच्यासमवेत दिल्लीहून गोव्यात परतल्यावर दाबोळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना वालंकाने सांगितले की, आपण जसे आपल्या वडलांसाठी स्फूर्तिस्थान आहोत तसेच तेही आपणासाठी स्फूर्तिस्थानच आहेत. कारण राजकारणात चर्चिलनी शून्यातून विश्व निर्माण केले व आपले वेगळे व्यक्तिमत्त्व उभे केले आहे. त्यांना वेगळे काढून गोव्याचे राजकारण पुढे सरकूच शकत नाही. चर्चिल ही काय चीज आहे ते पोळेपासून पेडणेपर्यंतच्या लोकांना चांगलेच माहीत आहे.
आपणामुळेच ते राजकारणात मागे पडत आहेत व त्यातूनच ते एक दिवस नामशेष होतील, अशी टीका करणारे दुसरे तिसरे कोणी नसून ते स्थानिक कॉंग्रेस नेतेच आहेत. पक्ष कमकुवत करणे व सरकारात बंडाळी माजविण्यासाठी त्यांनी युवा कॉंग्रेस निवडणुकीतून आपणास बाहेर फेकण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोपही वालंकाने केला. आज कॉंग्रेसजनच एकमेकांचे शत्रू बनत आहेत व त्यातूनच अशी मतप्रदर्शने केली जात आहेत, असेही वालंका म्हणाली.
Wednesday 27 July, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment