Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 21 May, 2010

"लैला'चा जोर ओसरला

हैदराबाद, दि. २० - बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेल्या 'लैला' या चक्रीवादळाचा जोर थोडा ओसरला असून, ते आज आंध्रप्रदेशातील मछलीपट्टणम येथे किनारपट्टीवर धडकले तरी केवळ पावसाच्या धडकेवरच सारे निभावल्याने जनतेने निश्वास सोडला. खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टीवरील सखल भागात राहणाऱ्या ४० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
'लैला' बंगालच्या उपसागरात स्थिरावले आहे. मात्र, आज ते किनारपट्टीला धडकेल, असे हवामान खात्याने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. जमीनवरून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग कमालीचा वाढल्यामुळे या चक्रीवादळाची गती संथ झाल्याचेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. मात्र, सध्या त्याचा वेग ११५ किलोमीटर प्रतितास इतका असल्याने चक्रीवादळाचा धोका कमी झालेला नाही. या वेगामुळे मोठे नुकसान होऊ शकते, असे आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही ४० हजार नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलविले असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.
दरम्यान,''प्रशासनाला मदत करण्यासाठी लष्कराची पथके तैनात करण्यात आली असून, ती संकटाचा सामना करण्यास सज्ज आहेत,'' असे संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी सांगितले आहे.
या चक्रीवादळाचा मोठा फटका नेल्लोर, प्रकाशम, गुंटूर, कृष्णा, पश्चिम गोदावरी आणि पूर्व गोदावरी या जिल्ह्यांना मोठा फटका बसण्याचे अनुमान असून, येत्या ३६ तासांत या भागात जोरदार ते अतिजोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री के. रोसय्या यांनी रात्रभर या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी टेली कॉन्फरन्सद्वारे चर्चाही केली. पावसाचा फटका बसलेल्या जिल्ह्यांत जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. तसेच, मदत शिबीरांमध्येही औषधे आणि अन्नधान्याचा साठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

ओरिसा सज्ज
भुवनेश्वर - "लैला' चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन ओरिसाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आणि मदत पथकांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज (ता.२०) सराव केला. चक्रीवादळामुळे ओरिसाच्या सागरी किनारपट्टीवरील जिल्ह्यांत पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम होणार असला तरी राज्य सरकारने सर्वच जिल्हा प्रशासनांना सावधानतेच्या सूचना दिल्या आहेत.
प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजप्रमाणे, "लैला'च्या प्रभावामुळे राज्याच्या दक्षिण भागात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवसांत जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे.

No comments: