Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 19 May, 2010

अर्जुन मुंडा होणार झारखंडचे मुख्यमंत्री

-२५ रोजी शपथविधी शक्य
-आळीपाळीने मुख्यमंत्रिपद

रांची, दि. १८ : गेल्या तीन आठवड्यांपासून झारखंडमध्ये निर्माण झालेली राजकीय अस्थितरता लवकरच समाप्त होणार असून विधानसभेच्या उर्वरित काळासाठी आळीपाळीने मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या मुद्यावर भाजपा आणि झामुमोने आज अखेर मान्यता दिली आहे. तशी माहिती भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अर्जुन मुंडा व झामुमोचे प्रमुख शिबू सोरेन यांनी आज येथे एका संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
"उर्वरित काळासाठी २८-२८ महिने मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पहिल्या कार्यकाळात राज्यात भाजप सरकार स्थापन करणार आहे', अशी घोषणा झारखंडचे मुख्यमंत्री शिबू सोरेन आणि भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अर्जुन मुंडा यांनी आज येथे एका संयुक्त पत्रकारपरिषदेत केली.
आपण राजीनामा केव्हा देणार असे शिबू सोरेन यांना विचारले असता "लवकरच' असे उत्तर सोरेन यांनी दिले. मात्र, शिबू सोरेन यांचा राजीनामा आणि अर्जुन मुंडा यांचा शपथविधी २५ मे रोजी पार पडेल, असा दावा भाजप आणि एजेएसयूच्या नेत्यांनी केला आहे.
८२ सदस्यीय झारखंड विधानसभेत भाजपा आणि झामुमोचे प्रत्येकी १८ सदस्य आहेत. याशिवाय या आघाडीला जदयुच्या दोन, ऑल झारखंड स्टुड्ंटस युनियनच्या (एजेएसयू) पाच आणि इतर दोन सदस्यांचा पाठिंबा आहे. आज पार पडलेल्या बैठकीला शिबू सोरेन, झामुमो विधिमंडळ पक्षाचे नेते हेमंत सोरेन, भाजपाच्या वरिष्ठ नेत्या करुणा शुक्ला, मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अर्जुन मुंडा आणि विद्यमान उपमुख्यमंत्री रघुवीर दास उपस्थित होते. या बैठकीत एजेएसयुचे प्रतिनिधित्व सुदेश महतो यांनी केले. भाजपाच्या नेतृत्वातील सरकारला पाठिंबा देण्याच्या हेमंत सोरेन यांच्या प्रस्तावाला विरोध करणारे टेकलाल महतो आणि हेमलाला मुरमू हेदेखील या बैठकीला उपस्थित होते.
भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदावार अर्जुन मुंडा हे आदिवासी समाजातील असून, यापूर्वी दोन वेळा त्यांनी झारखंडचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहेे. सध्या लोकसभेचे सदस्य आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले अर्जुन मुंडा १९९५ मध्ये सर्वप्रथम विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. बाबूलाल मरांडी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री राहिलेले अर्जुन मुंडा २००३ ते २००५ या कार्यकाळात पहिल्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले. यानंतर मार्च २००६ ते सप्टेंबर २००६ या कार्यकाळातही ते राज्याचे मुख्यमंत्री होते. आता अर्जुन मुंडा तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री होणार आहेत.

No comments: