Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 18 May, 2010

धडक मोर्चाने सचिवालय दणाणले

पोलिस व आंदोलक यांच्यात उडाली जोरदार झटापट
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - राज्यातील विविध गावांत बेकायदा डोंगरकापणी, खारफूटीची कत्तल, "सीआरझेड'चे उल्लंघन करून सर्रास बांधकामे होत असल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना भेटण्यासाठी पर्वरी सचिवालय परिसरात आलेल्या आंदोलनकर्त्यांत आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी झालेल्या झटापटीत खवळलेल्या एका महिलेने पर्वरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक देवेंद्र गाड यांच्या दोन्ही खाद्यांवरील सहा स्टार उपटून काढले. तर, तिला अडवण्यासाठी गेलेल्या एका महिला शिपायाच्या थोबाडीत लगावली. या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांपैकी २८ जणांना पर्वरी पोलिसांनी अटक करून नंतर सुटका केली. निरीक्षक देवेंद्र गाड यांनी त्या महिलेसह अन्य जमावावर सरकारी कर्मचाऱ्याला सेवा बजावण्यापासून अडवणूक केल्याने आणि बेकायदा जमाव केल्याचा आरोप ठेवून भा.दं.सं. १४०, १४३, १४५ व ३५३ कलमाखाली नोंद केला आहे. तर, ओलिंड परेरा या महिलेने निरीक्षक देवेंद्र गाड यांच्याविरुद्ध धक्काबुक्की आणि अंगावरील कपडे फाडल्याची तक्रार सादर केली आहे. दरम्यान, पोलिस स्थानकावर अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांची विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी भेट घेऊन चर्चा केली.
पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रात तसेच "सीआरझेड' क्षेत्रात विकासकामांसाठी दिलेले सर्व परवाने त्वरित मागे घेतले जावेत, तसेच बेकायदा डोंगरकापणी रोखण्यासाठी त्वरित फिरते पथक स्थापन करण्याची मागणी घेऊन आज वेर्णा, सांकवाळ, कोलवा, बाणावली येथील नागरिकांनी पर्वरी येथील सचिवालयावर मोर्चा आणला होता. अशा प्रकारचा मोर्चा येणार असल्याची कोणतीही आगाऊ माहिती पोलिसांना मिळाली नसल्याने सचिवालयाच्या प्रवेशद्वारावर नेहमीचीच पोलिस कुमक होती. याचा फायदा घेऊन सुमारे ३० आंदोलनकर्ते विविध मार्गांतून सचिवालयात मुख्यमंत्र्यांच्या केबिनबाहेर पोहचले. यावेळी त्यांनी त्याच ठिकाणी ठाण मांडून मुख्यमंत्र्यांना बाहेर येण्याची मागणी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांपैकी पाच जणांना चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले, मात्र सर्वांनी तेथेच घोषणा देण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी कोणीही बाहेर जाण्यास तयार नसल्याने त्यांना अटक केली जाणार असल्याचा इशारा यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी अटकसत्र सुरू असताना आंदोलनकर्त्यांत आणि पोलिसांत झटापट झाल्याने आंदोलन अधिक चिघळले. अटक करून वाहनात लोकांना चढवताना एक महिला खाली कोसळल्याने संतापलेल्या महिलेने देवेंद्र गाड यांच्यावर हल्ला चढवला. यात देवेंद्र गाड याच्या गणवेशावरील "स्टार' ओढून काढण्यात आले. तसेच गणवेशही फाडण्यात आला. यावेळी तिला ताब्यात घेण्यासाठी महिला शिपाई पुढे सरसावल्या असता एका महिला पोलिस शिपायावर थोबाडीत लावण्यात आली तसेच त्यांच्याकडून लाठी हिसकावून तिच्याद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सर्व जमावाला अटक करून पर्वरी पोलिस स्थानकावर नेण्यात आले. नंतर त्यांना अटक करून सोडून देण्यात आले. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलनकर्ते पर्वरी पोलिस स्थानकासमोर ठाण मांडून बसून होते.

म्हणे मतांची गरज नाही !
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आम्हाला पाच मिनिटे वेळ देण्याचेही टाळले. त्यांची आगाऊ वेळ न घेता आल्याने आम्हाला तेथून हाकलण्यात आले. निवडणुकीच्यावेळी मते मागायला आमच्या दारात आगाऊ वेळ घेऊन येतात का, असा प्रश्न श्री. कामत यांना केला असता "मला तुमच्या मतांची गरज नाही. तुमच्या मतांवर मी निवडून येत नाही' असे उत्तर दिल्याचे श्रीमती कारमीन मिरांडा आणि स्वाती केरकर यांनी सांगितले.

No comments: