मिदनापूर, दि. १९ : नक्षलवाद्यांनी पाच राज्यात पुकारलेल्या ७२ तासांच्या बंदच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पश्चिम बंगालच्या लालगढ येेथे नक्षल्यांनी केलेल्या आयईडीच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे(सीआरपीएफ) ४ जवान शहीद झाले आणि दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत.
हिंसेचा त्याग करून नक्षलवाद्यांनी सरकारशी चर्चा करावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी कालच केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली आहे हे विशेष. सीआरपीएफच्या जवानांचे एक पथक गोलतोर मार्केट परिसरातील आपल्या कॅम्पमधून आजूबाजूच्या गावात गस्त घालण्यासाठी निघाले असता पश्चिम मिदनापूरच्या लालगढ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामगढ भागात आज सकाळी ११.३० च्या सुमारास हा स्फोट झाला.
नक्षल्यांनी केलेल्या या स्फोटात सीआरपीएफचे चार जवान शहीद झाले आणि दोन जण जखमी झाले, अशी माहिती सीआरपीएफच्या पूर्वोत्तर भागाचे महानिरीक्षक एम. नागेस्वर राव यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. या स्फोटात सीआरपीएफचे तीन कॉन्स्टेबल आणि हे पथक ज्या वाहनातून प्रवास करत होते त्या वाहनाचा चालक जागीच ठार झाले . घटनेच्या ठिकाणी पाच फूट खोल खड्डा तयार झाला आहे आणि वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
Thursday 20 May, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment