Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 21 May, 2010

नक्षल्यांविरूद्ध कठोर कारवाई करा : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, दि. २० - शस्त्रांच्या धाकावर समाजाला संपविण्याचे नक्षल्यांचे मनसुबे उधळून लावत त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
"निष्पाप नागरिकांच्या हत्यांचे सत्र थांबविलेच पाहिजे आणि त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, असे मोदी यांनी आज येथे योजना आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. आज अलिगढ येथील एका कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातूनच सोडवता येऊ शकतो, असे म्हटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. मला भरकटलेल्या युवकांसंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता व त्या अनुषंगाने मी त्या प्रश्नाचे उत्तर दिले होते, असे मोदी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. या मुद्यावर सरकारने काय करावे याबाबत मला काहीही विचारण्यात आले नव्हते व मी काहीही उत्तर दिले नव्हते, असेही ते म्हणाले.
हिंसाचाराचा मार्ग अंगिकारलेल्या युवकांना आपण काय संदेश द्याल?, असे मला या कार्यक्रमात विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देताना "हिंसाचाराचा मार्ग अवलंबल्याने परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही अशी माझी त्यांना विनंती आहे', असे उत्तर मी दिले होते असे मोदी यांनी पुढे सांगितले. या युवकांनी शस्त्रास्त्रांचा त्याग करून घटनेच्या चौकटीत राहून योग्य व्यासपीठावर आपले मुद्दे उपस्थित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हे भरकटलेले युवक आमचेच आहे. त्यामुळे हिंसाचाराने कुठल्याही प्रश्नावर तोडगा निघू शकत नाही, हे त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे, असेही मोदी म्हणाले. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी एका प्रवासी बसला स्फोट करून उडवून दिल्यानंतर, नक्षल्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याची मागणी भाजपा नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी राजधानीत एका पत्रकारपरिषदतेत केली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या आजच्या विधानाला प्रसार माध्यमांनी ठळकपणे प्रसिद्धी दिल्यानंतर नरेंद्र मोदींनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

No comments: