Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 18 May, 2010

नक्षल्यांनी भूसुरुंगाद्वारे बस उडवली, ४० ठार

छत्तीसगडमधील दंतेवाडा परिसर पन्हा हादरला

रायपूर, दि. १७ - छत्तीसगडमधील दंतेवाडा परिसर पुन्हा एकदा नक्षलवाद्यांच्या हल्ल्याने हादरला आहे. दंतेवाडाहून सुकमाला जाणारी बस नक्षलवाद्यांनी आज भूसुरूंग पेरून उडवून दिली. या घटनेत पोलिस कर्मचाऱ्यांंसह सुमारे ४० जण ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. हा हल्ला करून नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारला थेट आव्हानच दिले आहे.
गेल्या रविवारीच नक्षलवाद्यांनी ६ जणांची निर्घृण हत्या केली होती. त्या घटनेला ४८ तास उलटत नाहीत तोच आज दंतेवाडाहून सुकमा येथे जाणारी बस भूसुरूंग स्फोटाने नक्षलवाद्यांनी उडवून दिली. या बसमध्ये पोलिस, अधिकारी व सुरक्षा जवानांसह एकूण ४० ते ४५ प्रवासी होते. त्यामधील ४० जण ठार झाले.
जखमींना नजीकच्या इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये पोलिस व सुरक्षा जवानांचाही समावेश आहे. यापूर्वी दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्याा तुकडीवर हल्ला चढवून त्यांना ठार केले होते. त्यानंतर नक्षलावाद्यांच्या विरोधात केंद्र सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. परंतु तरीही नक्षलींनी आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या असून, आजचा हल्ला हा त्याचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे.
गेल्या महिन्यात जगदलपूर जवळील चिंतलनार जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखील पोलिस दलाचे ७८ जवान ठार झाले होते. त्यानंतरही या भागात नक्षली कारवाया सुरूच असून आज पुन्हा मोठा हल्ला करण्यात आला आहे. मृतांमध्ये पोलिसांच्या एका विशेष अधिकाऱ्याचाही समावेश आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की, सदर बस हवेत उंच उडाली. त्यानंतर आतील पोलिसांच्या आर्त किंकाळ्यांनी सारा परिसर दणाणून गेला. घटनास्थळी अत्यंत विदारक दृश्य दिसत होते. सर्वत्र मानवी अवयव आणि रक्ताचा सडा पडला होता. केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. जेथे स्फोट झाला त्या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच नक्षलवाद्यांचा छडा लावण्यासाठी सारा परिसर पिंजून काढण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.
अलीकडेच नक्षलवादाच्या मुद्यावरून केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांच्यात तीव्र स्वरूपाचे मतभेद निर्माण झाले होते. हा प्रश्न मानवी दृष्टिकोनातून सोडवला जावा, असे मत दिग्विजयसिंग यांनी व्यक्त केले होते.
आता नक्षलवाद्यांनी नव्याने केंद्र सरकारला आव्हान दिले आहे. कारण केंद्र सरकारने नक्षलवाद संपवण्याच्या घोषणा अलीकडच्या काळात वारंवार केल्या आहेत. त्यामुळे नक्षलवादी अशा प्रकारे आपले अस्तित्व दाखवून देण्याच्या इराद्याने चवताळले आहेत. साहजिकच आता त्यांच्याविरोधात ठोस कारवाई करण्याची वेळ आल्याचा सूर देशपातळीवरून व्यक्त होत आहे.

No comments: