सा. बां. खात्याकडून ३.६० कोटी रु.ची बिले अजूनही प्रलंबित
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): सार्वजनिक बांधकाम खात्याने कंत्राटदारांची सुमारे ३.६० कोटी रुपयांची बिले अजूनही प्रलंबित आहेत. ती त्वरित अदा करावीत या मागणीसाठी आज सुमारे २५ कंत्राटदारांनी "विभाग दोन'च्या कार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. तसेच आजच्या निविदा प्रक्रियेवरही कंत्राटदारांनी बहिष्कार टाकला.
कोट्यवधी रुपयांची बिले न देताच खात्याने नव्याने निविदा काढल्याने त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय तिसवाडी तालुक्यातील कंत्राटदारांनी घेतल्याची माहिती उमेश धारवाडकर यांनी दिली.
याविषयी विभागाचे अभियंते पी. बी. शेर्दारकर यांना विचारले असता, ही बिले अदा करण्यासाठी सरकारने सध्या ७५ लाख रुपये उपलब्ध केले आहेत; मात्र ते पैसे कंत्राटदारांनी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे सदर रक्कम परत पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले.
सुमारे ३.६० कोटी रुपयांची बिले अदा झालेली नसल्याने मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यास या कंत्राटदारांनी नकार दर्शवला आहे. सार्वजनिक बांधकाम खाते केवळ पणजी विभागाकडेच जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप धारवाडकर यांनी केला. पणजी विभागासाठी फक्त ४२४ कोटी रुपयेच उपलब्ध केले आहेत. तर, मडगाव शहरासाठी तब्बल २ हजार ४९८ कोटी रुपये निधी उपलब्ध केला आहे. तेथील विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांना वेळोवेळी त्यांची बिले अदा केली जातात. मग केवळ पणजी विभागातीलच कंत्राटदारांबाबत दुजाभाव का, असा सवाल कंत्राटदारांनी केला आहे.
या कंत्राटदारांची बिले थकवली गेल्याने त्यांच्यासमोर मोठीच अडचण निर्माण झाली आहे. रेती, सिमेंट, लोखंडाचा पुरवठा करणाऱ्यांचीही बिले थकीत असल्याने पुढील कामे हाती घेणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. विकासकामे केलेल्यांचे पैसे द्यायला सरकारकडे निधी नसेल तर अजूनही निविदा कशा काढल्या जातात, असाही प्रश्न यावेळी करण्यात आला. गेल्या सात महिन्यांपासून या कंत्राटदारांची बिले प्रलंबित आहेत.
Wednesday 19 May, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment