Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 9 May, 2010

गोव्याला नक्षलवादाचा धोका!

मुख्य सचिवांनी मागवला पोलिसांकडून अहवाल
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): बेकायदा खाणींमुळे चिंताक्रांत झालेल्या स्थानिकांना हाताशी धरून गोव्यातही नक्षलवादी चळबळ पसरवण्याचा प्रयत्न होत नाही ना, यासंदर्भातील सखोल अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी पोलिस खात्याला दिला आहे. काही काळापूर्वी नेमकी अशीच भीती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली होती. तथापि, त्यांच्या त्या वक्तव्याकडे तेव्हा जवळपास सर्वच शासकीय घटकांनी साफ दुर्लक्ष केले होते हे येथे उल्लेखनीय ठरावे.
राज्यातील विविध भागांत बेकायदा खाण व्यवसायाने उच्छाद मांडला आहे. बेकायदा खाण व्यवसाय स्थानिकांच्या दारांत पोहचला असून तेथील लोकांना देशोधडीला लावण्याचेच प्रकार सुरू आहेत. विविध भागांत या व्यवसायामुळे स्थानिक लोक असुरक्षित बनले आहेत व सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करून खाण व्यावसायिकांचेच हित पाहत असल्याची मानसिकता दृढ बनत चालली आहे. अशावेळी अशांत व आपल्या अस्तित्वाबाबत चिंताग्रस्त बनलेल्या स्थानिकांना हाताशी धरून गोव्यातही नक्षली चळवळ रुजविण्याचा प्रयत्न तर होत नसावा ना, असा खडा सवाल सध्या उपस्थित झाला आहे.
मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी पोलिस खात्याला याबाबत सखोल अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नक्षलवाद्यांसाठी गोवा हे सुरक्षितस्थळ बनल्याने ते इथे आसरा तर घेत नाहीत ना, याबाबत चौकशी करण्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी काही काळापूर्वी गृह खात्याच्या अस्थायी समितीच्या बैठकीनिमित्ताने बोलताना ही शक्यता वर्तविली होती.
राज्यात बेकायदा खाण व्यवसायाविरोधात अनेक ठिकाणी स्थानिकांचे आंदोलन सुरू आहे. या खाण व्यवसायामुळे स्थानिकांचे अस्तित्वच धोक्यात आल्याने आपल्या जगण्यासाठी हे लोक आंदोलनाच्या पवित्र्यात उभे आहेत. प्रशासनाकडून या लोकांच्या समस्या व अडचणींबाबत डोळेझाक होत आहे व त्यामुळे हे लोक निराधार बनले आहेत. या स्थानिक लोकांची अशांतता व अस्थिरता याचा लाभ उठवून गोव्यातही नक्षली चळवळ रूजवण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,अशी शक्यताच पर्रीकर यांनी दर्शवली होती. पर्रीकरांच्या या विधानाकडे तेव्हा सगळ्यांनीच दुर्लक्ष केले होते.आता पोलिसांनी ओरिसातील माओवादी त्रिशूल मंचचा पुढारी शंभू बेग याला अटक करून नक्षलवाद्यांनी गोव्यात आसरा घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पर्रीकरांनी केलेल्या वक्तव्याबाबत गंभीरतेने विचार करण्याची वेळ सरकारवर ओढवली आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेला शंभू बेग हा गोव्यात एका औद्योगिक वसाहतीत कामाला होता. त्याचे मित्रही अशाच विविध ठिकाणी कामाला आहेत. गोव्यात बाहेरून स्थलांतरित होणारे कामगार नेमके इथे रोजगारासाठीच येतात की त्यांचे इतरही काही उद्योग सुरू आहेत, याची पडताळणी करण्याची वेळ आली आहे, अशी मानसिकता आता पोलिसांचीही बनली आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही स्थलांतरित कामगारांची पार्श्वभूमी तपासून पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. नक्षलवादी गोव्यात आपले पाय पसरवण्याच्या प्रयत्नात असल्याची शक्यता मात्र मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. खाणविरोधकांना सहानुभूती दाखवून राज्यात नक्षलवादी चळवळ रूजली जाण्याची शक्यताही त्यांनी नजरेआड केली आहे.

No comments: