Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 15 May, 2010

'भाजप नेत्यांचे मन मोठे आहे' गडकरींनी खेद व्यक्त करणे पुरेसे: अमरसिंग

नवी दिल्ली, दि. १४ : भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या लालू, मुलायमबाबतच्या कथित वक्तव्यानंतर त्यांनी व्यक्त केलेला खेद स्वागतार्ह आहे. सपा आणि राजद नेत्यांनी हे प्रकरण फारसे ताणून धरू नये. कारण आपल्या वक्तव्याविषयी जाहीर खेद प्रकट करण्यासाठीही मोठे मन हवे. भाजप नेत्यांचे मन खरेच मोठे आहे आणि याचा अनुभव मी स्वत:देखील घेतला असल्याचे अमरसिंग यांनी म्हटले आहे.
गडकरींच्या वक्तव्यावरून लालू, मुलायम यांनी क्षमायाचनेचा हट्ट धरला आहे. या प्रकरणात उडी घेत अमरसिंग यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे की, आपल्या वक्तव्यांविषयी गडकरींनी खेद व्यक्त करणे खरेतर पुरेसे आहे. आता हे प्रकरण लालू, मुलायम यांनी फारसे लावून धरण्यात अर्थ नाही. त्यांनी गडकरींना क्षमा केली पाहिजे. कारण त्यांनी आपल्या वतीने नम्रपणे खेद व्यक्त केला आहे.
याबाबतीत भाजप नेत्यांचा मलाही अतिशय चांगला अनुभव आला आहे. अरुण जेेटली आणि एस. एस. अहलुवालिया या दोन नेत्यांशी लिबरहान आयोगावरील चर्चेदरम्यान दोन-दोन गोष्टी झाल्या. मी त्यांना काही बोललो आणि नंतर त्याविषयी खेद व्यक्त केला तेव्हा या दोन्ही नेत्यांनी ते प्रकरण तिथेच संपविले. अणुकरारावरील चर्चेदरम्यान मी अडवाणींविषयी काही अनुदार काढले होते. नंतर मी त्यांना व्यक्तिश: भेटून खेद व्यक्त केला तर त्यांनी मला क्षमा केली, असा उल्लेखही अमरसिंग यांनी आवर्जून केला.
सपातील काही नेत्यांनी मला वाट्टेल ते बोलून घेतले. पागल, कचरा, बेशरम अशा शब्दांत माझा जाहीर अपमान केला. नंतर चूपचाप फोन करून क्षमा मागितली. त्यांनी क्षमा मागितल्याने मी जाहीररित्या सांगताच ते पुन्हा माझ्यावर भडकले. अशा राजकारण्यांपेक्षा तर भाजप नेते मोठे आहेत, जे जाहीरपणे खेद तर व्यक्त करतात. राजकारणात कोण "कुत्रा' आहे, हे मला चांगले ठावूक आहे. पण, अशा वक्तव्यांसाठी जर सपा गडकरींवर खटला दाखल करणार असेल तर मलादेखील सपाने वाट्टेल ते दूषण दिले आहे. त्यासाठी मीही सपावर खटला दाखल केला पाहिजे, असेही अमरसिंग म्हणाले.

No comments: