Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 11 May, 2010

बार्देशमधील तिघा सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात 'वॉरंट'

जनगणनेच्या कामात हयगय केल्याने मामलेदारांकडून कारवाई
म्हापसा, दि. १० (प्रतिनिधी): जनगणनेचे काम सरकारी कर्मचाऱ्यांना खूप दिवसांपूर्वी सोपवण्यात आले असून काही कर्मचाऱ्यांनी अजूनही या कामाला सुरुवात केली नसल्याने बार्देश मामलेदारांनी तीन सरकारी कर्मचाऱ्यांना कायदेशीर "वॉरंट' बजावले आहे.
केंद्र सरकारने लोकसंख्येची गणना करण्याचे आदेश गेल्या एप्रिल महिन्यात दिले होते. त्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा उपयोग करून घेण्याचे आदेश स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानुसार बार्देश तालुक्यातील कर्मचाऱ्यांची निवड करून तालुक्यातील सात मतदारसंघात जनगणनेचे काम करण्याची जबाबदारी मामलेदारांनी या कर्मचाऱ्यांना सोपवली होती. परंतु, पर्वरी येथील दोन व कळंगुटमधील एक अशा तीन कर्मचाऱ्यांनी त्यांना वाटून दिलेल्या विभागातील जनगणनेचे काम अजूनही सुरू केलेले नाही. हे निदर्शनास येताच या तिघांनाही बार्देशचे मामलेदार श्री. शंखवाळकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. परंतु, या नोटिशीलाही त्यांनी कोणतीच दाद न दिल्याने शेवटी मामलेदारांनी त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करून म्हापसा पोलिसांना त्यांना त्वरित अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, जनगणनेच्या कामाला सुरुवात केल्यानंतर आठवडाभरात आपण केलेल्या कामाचा अहवाल मामलेदारांना सादर करावयाचा असतो. परंतु, आजपर्यंत किमान ७० ते ८० कर्मचाऱ्यांनी हा अहवाल मामलेदारांना सादर केलेला नाही, अशी माहितीही उपलब्ध झाली आहे. या कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्याचे श्री. शंखवाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, वॉरंट जारी केलेल्या तिघाही कर्मचाऱ्यांना अटक करून आपल्यासमोर हजर केल्यानंतर त्यांच्याकडून हे काम पूर्ण करून घेतले जाईल व या विषयीची सर्व माहिती वरिष्ठांना देण्यात येईल; त्यानंतर मुख्य सचिव संबंधितांवर कारवाई करतील असेही त्यांनी सांगितले.

No comments: