Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 11 May, 2010

मान्सून ४ जूनदरम्यान गोव्यात!

पणजी, दि. १० : उन्हाच्या तीव्र झळांनी त्रासलेल्या गोमंतकीयांसाठी हवामान खात्याने आनंदाची बातमी आणली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येत असून सर्वांचीच उकाड्याच्या त्रासातून सुटका होण्याचे शुभवर्तमान आहे. आत्ताच्या मान्सूनच्या स्थितीनुसार १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल, ४ जूनला तो गोव्यात पोहचेल आणि नंतर त्याचा महाराष्ट्रातला प्रवास सुरू होईल. मान्सूनच्या या प्रवासाबद्दल वेधशाळेकडून नियमित माहिती पुरवण्यात येणार आहे.
पाऊस वेळेवर दाखल होणार असल्याने पाणीटंचाई आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या गोवेकरांना मोठाच दिलासा मिळणार आहे. वेधशाळेच्या अधिकाऱ्यांच्या मते गेल्या काही वर्षांतील मान्सूनचे वेळापत्रक पाहता यावेळेळी त्याला थोडासा उशिराच झाला आहे. मात्र यावेळी मान्सून केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्याआधीच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत मान्सूनची धडक जूनच्या पहिल्या आठवड्यात बसण्याची शक्यता आहे.
एकीकडे उकाडा तर दुसरीकडे पाणीटंचाई अशा दुहेरी समस्येला तोंड देत असताना या बातमीमुळे सर्वांनाच दिलासा मिळणार आहे.
हवामान खात्याचे प्रमुख अजित त्यागी यांनी सांगितले की, अपुरा पाऊस आणि अवकाळी पाऊस यामुळे मागील वर्षी पाणी टंचाईच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले होते. शेतकरीही पिकाचे नुकसान झाल्यामुळे हैराण झाले आहेत. तथापि, यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस पडेल .
एल निनोच्या सध्याच्या प्रभावासंदर्भात भारतीय तसेच विविध आंतरराष्ट्रीय वेधशाळांनी आकडेवारी संकलित केली आहे. या माहितीच्या विश्लेषणावरुन यंदाचा पावसाळा भारताला अनुकूल राहील असेच दिसत असल्याचे त्यागी यांनी सांगितले. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीवरुन तरी पावसाचा अंदाज अचूक असल्याची खात्री त्यांनी दिली. चांगला पाऊस पडणार असल्यामुळे यंदा शेतीच्या उत्पन्नात वाढ झालेली दिसेल , असेही ते म्हणाले.

No comments: