Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 15 May, 2010

खाणींमुळे शेती, बागायती धोक्यात

सावर्डेतील ग्रामस्थांचे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
वाळपई, दि. १४ (प्रतिनिधी): सावर्डे वाळपई येथील नियोजित खाणीच्या विरोधात आंदोलनाने आता मोठे स्वरुप धारण केले असून, या खाणीमुळे सत्तरीतील शेती धोक्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी आज कृषी अधिकारी संजीव मयेकर यांना खाणविरोधात निवेदन दिले.
खाणविरोधी समितीचे अध्यक्ष रघु गावकर, बोंबी सावंत, अमृतराव देसाई, आत्मा गावकर, नारायण नाईक, ऍड.शिवाजी देसाई, सचित म्हाऊसकर आदींचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने हे निवेदन श्री. मयेकर यांना दिले. यावेळी बोलताना रघु गावकर म्हणाले की, या खाणीमुळे सत्तरीतील सर्व शेती, बागायती नष्ट होणार आहे, त्यामुळे पर्यावरण समतोलही बिघडणार आहे.
खाणींना कृषी खात्यानेच विरोध केल्याने सिंधुदुर्गात खाणी बंद पडत आहेत, याकडे लक्ष वेधून ऍड. शिवाजी देसाई यांनी खाणीसंदर्भातील उच्चाधिकार समितीत कृषी खात्याचाही समावेश असण्यावर भर दिला. खाणींमुळे शेतींना धोका आहे, याची दखल कृषी खात्याने घ्यायला हवी,असे देसाई यांनी सांगितले.
सावर्डेतील १५०० हेक्टर शेतजमीन व काजू तसेच दुग्ध व्यवसायाला खाणींमुळे धोका निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

No comments: