Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 9 May, 2010

झारखंडमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री

नव्या नेत्याची उद्या निवड
नवी दिल्ली, दि. ८ : झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्याच्या मुद्यावरून भारतीय जनता पक्ष आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यात निर्माण झ्रालेला तिढा आज अखेर सुटला असून, "झामुमो'च्या पाठिंब्याने भारतीय जनता पक्ष राज्यात लवकरच सरकार स्थापन करणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी नवा नेता निवडण्याकरता येत्या सोमवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, पक्षाचे वरिष्ठ नेते अनंतकुमार, झारखंडचे विद्यमान उपमुख्यमंत्री रघुवीर दास, झ्रामुमो विधिमंडळ पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन आणि एजेएसयुचे अध्यक्ष सुदेश महतो यांच्या उपस्थितीत आज येथे पार पडलेल्या बैठकीत या मुद्यावर हा तोडगा काढण्यात आला.
मुख्यमंत्रिपदासाठीचा आपला उमेदवार निवडण्यासाठी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक येत्या सोमवारी होणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी आमची झालेली चर्चा फलदायी ठरली आहे. त्यानुसार उर्वरित कालावधीसाठी आम्ही भाजपच्या नेतृत्वातील सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती झामुमो नेते हेमंत सोरेन यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यात राष्ट्रपती राजवट येऊ नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.
झारखंडला कॉंग्रेस पक्षाच्या कुप्रशासनापासून वाचविण्यासाठी आम्ही राज्यात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात विकास कार्याला अग्रक्रम देणारे स्थायी सरकार देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे भाजपचे वरिष्ठ नेते अनंतकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नव्याने स्थापन होणारे सरकार आपला विधानसभेचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण करेल, असेही ते म्हणाले.
आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी एक किमान कृती कार्यक्रम लवकरच तयार करण्यात येईल. याबाबत राज्यातील भाजप, झामुमो आणि ऑल झारखंड स्टुडंटस युनियन आणि जदयुच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी भाजपाध्यक्ष नितीन गडकरी लवकरच विशेष दूत रांचीला पाठविणार आहेत, असेही अनंतकुमार यांनी सांगितले.
झारखंडचे मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी २८ एप्रिलला संसदेत कपात प्रस्तावावर मतदान करताना संपुआ सरकारच्या बाजूने मतदान केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपाने झारखंड सरकारला असलेला आपला पाठिंबा काढून घेतला होता.मात्र, हेमंत सोरेन यांनी भाजपच्या नेतृत्वातील सरकारला पाठिंबा देण्याची घोषणा केल्यामुळे पक्षाने आपला हा निर्णय मागे घेतला होता.
भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे सरचिटणिस अर्जुन मुंडा आणि विद्यमान उपमुख्यमंत्री रघुवीर दास हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील प्रमुख उमेदवार आहेत.

No comments: