Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 14 May, 2010

मूर्तिभंजनप्रकरणी "एसआयटी'ची स्थापना

चर्चमधील तोडफोडीनंतर सरकारला खडबडून जाग
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) - कुडचडे येथील गार्डियन एंजल चर्चमधील मूर्तींची मोडतोड होताच खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने गुन्हा अन्वेषण विभागामार्फत पुन्हा नव्याने विशेष तपास पथक "एसआयटी'ची स्थापना केली असून मडगाव येथील बॉंबस्फोट प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी नियुक्त केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश करण्यात आला आहे.
सुमारे दीड वर्षापूर्वी पहिल्यांदा "एसआयटी'ची स्थापना करण्यात आली होती. मात्र तब्बल ३५ हिंदू मूर्तींच्या झालेल्या मोडतोड प्रकरणांचा तपास लावण्यात या पथकाला विशेष यश प्राप्त झाले नव्हते.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कुडचडे येथील गार्डियन एंजल चर्चच्या परिसरातील मूर्तींची मोडतोड करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाचा त्वरित छडा लावणार असल्याचे आश्वासन दिले होते. यावेळी माथेफिरूने सेंट बेनेडिट आणि अवर लेडी ऑफ लूर्डस या मूर्तींची नासधूस केली होती. या मूर्ती पन्नास वर्षांपूर्वी खास पोर्तुगालहून आणण्यात आल्या होत्या. याच ठिकाणी असलेल्या येशू ख्रिस्ताच्या आणि फा. आग्नेल यांच्याही मूर्तींची तोडफोड केली गेली होती.
दरम्यान, गेल्या तीन वर्षांत सलगपणे हिंदूंच्या मूर्तींचे भंजन होत आले आहे. मात्र या प्रकरणांतील खरा आरोपी जनतेसमोर आणण्यात गुन्हा अन्वेषण विभागाला अपयश आल्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
विशेष पथक स्थापन करून सरकारला केवळ राजकीय डाव साधायचा आहे. गोव्यातील हिंदूंना कोणी राजकीय वालीच राहिलेला नाही, हे गृहखात्यानेच सिद्ध केले आहे. गेल्या तीन वर्षांत ३५ घुमटी आणि मंदिरांमध्ये मूर्तिभंजन करणारे आरोपी कोण आहेत, याचा तपास करण्यापेक्षा गृहमंत्र्यांनी उलट काही हिंदूच हे काम करीत असल्याचे सिद्ध करण्याचा अट्टहास चालवला आहे, असा आरोप मंदिर सुरक्षा समितीचे निमंत्रक राजू वेलिंगकर यांनी केला आहे. त्यामुळे कवेश गोसावी याला या प्रकरणात पोलिसांनी नाहक गुंतवल्याची शंका घेण्यास वाव मिळत असल्याचे श्री. वेलिंगकर म्हणाले. हिंदूंना पद्धतशीरपणे संपवण्यासाठीच केंद्रातून कटकारस्थाने केली जात आहेत. त्याचीच री गोवा सरकार ओढण्याचा प्रयत्न करीत आहे. बेकायदा धार्मिक बांधकामांसंदर्भात तलाठ्यांनी केलेले सर्वेक्षण हे पूर्णपणे राजकीय स्वरूपाचे असल्याचा दावा त्यांनी केला. कारण तेरेखोल ते काणकोणपर्यंत पाहणी केल्यास साधारण १ हजार २०० ते दीड हजार बेकायदा क्रॉस आढळून येतील. मात्र केलेल्या सर्वेक्षणात सर्वेक्षणात जेवढी हिंदूची मंदिरे जात आहेत तेवढेच ख्रिश्चनांचे क्रॉसही जात असल्याचा आव आणण्यात आला आहे, असे ते म्हणाले. खुद्द गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात अनेक बेकायदा मशिदी उभ्या राहिल्या असून त्यांचेही सर्वेक्षण केले जावे अशी मागणी त्यांनी केली
व यापूर्वी गुन्हा अन्वेषण विभागाने मूर्तिभंजन प्रकरणात अटक केलेल्या कवेश गोसावी याच्या नार्को चाचणीचे काय झाले, असा प्रश्नही उपस्थित केला. राज्यातील वाढत्या मूर्तिभंजन प्रकरणात लक्ष घालण्यासाठी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांना एक निवेदन सादर करण्यात आले होते. त्याचा श्री. नाईक यांनी कोणता पाठपुरावा केला तेही त्यांनी जनतेसमोर ठेवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
हिंदूंच्या बाबतीत या सरकारचे दुटप्पी धोरण असून यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या "एसआयटी'ने तपास काम करण्यात अजिबात गांभीर्य दाखवले नाही, अशी टीका हिंदू जनजागृती समितीचे निमंत्रक जयेश थळी यांनी आपली यासंदर्भात प्रतिक्रिया देताना व्यक्त केली.

No comments: