म्हापसा, दि. २७ (प्रतिनिधी): म्हापसा-गिरी येथील हॉटेल ग्रीनपार्कजवळील राष्ट्रीय हमरस्त्यावर आज रात्री ८.३०च्या सुमारास ट्रॉली व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात राजस्थान येथील दोन तरुण जागीच ठार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज रात्री ८.३०च्या दरम्यान गिरीहून करासवाड्याच्या दिशेने जाणारी जीए ०१ एल १५४७ ही स्प्लेंडर आणि पणजीच्या दिशेने जात असलेली एच आर -५५ ए - ११२८ ही ट्रॉली यांच्यात हॉटेल ग्रीनपार्कजवळील साकवाजवळ भीषण अपघात घडला. ट्रॉलीने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवर स्वार अनिल रामनारायण बिस्नोई (१८) आणि हनुमान लालाराम जत (१९) हे मूळ राजस्थानचे पण सध्या खोर्ली म्हापसा येथे राहत असलेले तरुण उसळून रस्त्यापलीकडील शेतात जाऊन पडले व त्यांना जागीच मरण आले. अपघात घडताच ट्रॉली चालकाने वाहन रस्त्याशेजारी उभे करून पळ काढला.
अपघाताची माहिती मिळताच संदीप केसरकर, शैलेश नार्वेकर, कृष्णा गावस, रमेश कळंगुटकर आदी पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली व पंचनामा केला. अपघातात सापडलेल्या दोन्ही युवकांना त्यांनी म्हापसा येथील आझिलो इस्पितळात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. म्हापसा पोलिसांनी फरारी असलेल्या ट्रॉली चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
Wednesday 28 April, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment