Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 28 April, 2010

तळीत बुडून दोघे विद्यार्थी मृत्युमुखी

वाघ कोळंब येथील दुर्घटना
म्हापसा, दि. २७ (प्रतिनिधी): हरमल समुद्रकिनाऱ्याजवळ वाघ कोळंब या तळीजवळ खेळताना तळ्यात पडलेला बॉल आणण्यासाठी तळीत उतरलेल्या अंकित राजेंद्र साखरदांडे (वय २१ रा.पणजी) व यशवंत शिवाजी ठाकूर (वय १९ रा. बांदा) या म्हापशातील ज्ञानप्रसारक कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आज बुडून मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याविषयी पेडणे पोलिस स्थानकचे उपनिरीक्षक राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हापसा येथील ज्ञानप्रसारक हायस्कूलचे सुमारे १० विद्यार्थी हरमल येथे सहलीसाठी गेले होते. हे विद्यार्थी हरमल समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या वाघ कोळंब तळीजवळ खेळत असताना बॉल त्या तळीत पडला. हा बॉल काढण्यासाठी अंकित आणि यशवंत पाण्यात उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज त्यांना आला नाही. ते गटांगळ्या खाऊ लागले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
या अपघाताचा पंचनामा निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राऊत यांनी करून दोन्ही मृतदेह बांबोळी येथे शवचिकित्सेसाठी पाठवले. दूधसागर नदीत असेच सहलीसाठी गेलेले सांताक्रुझचे दोघे तरुण बुडून मरण पावल्याची घटना ताजीच असताना ही आणखी एक दुर्घटना घडली आहे.

No comments: