Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 28 April, 2010

कासव कृती गट स्थापण्याचा विचार

'गोवादूत'शी कार्तिक शंकर यांचा वार्तालाप
आंतरराष्ट्रीय कासव संवर्धन परिषद

पणजी, दि. २७ (विशेष प्रतिनिधी): गोव्यातील कासवांच्या वास्तव्यासंबंधी माहिती खरोखरच प्रोत्साहन देणारी असून, आपण स्थानिकांशी यावर संपर्क साधण्याच्या व कासव कृती गट स्थापन करण्याच्या विचारात आहोत, असे आंतरराष्ट्रीय समुद्री कासव सोसायटीचे अध्यक्ष कार्तिक शंकर यांनी "गोवादूतला' सांगितले. दक्षिण आशिया विभागात पहिल्यांदाच कासवांबद्दल परिषद आयोजित केली असून, त्याचा उद्देश कासवांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असलेले व कासवांद्वारे वापरण्यात येणारे किनारी भाग, तीर आणि जैविकशास्त्राकडे लक्ष वेधण्यासाठी असल्याचे श्री. शंकर म्हणाले. पणजीतील कला अकादमी येथे समुद्रातील "कासवांचे जीवशास्त्र व संवर्धन' या विषयावर ३० वी वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद सुरू आहे. यावेळी "गोवादूत' ला दिलेल्या खास मुलाखतीत, समुद्रातील कासवांचे रक्षण आणि संवर्धन व समुद्रातील पर्यावरणशास्त्र आणि मनुष्य वस्ती यावर श्री. शंकर यांनी मोकळेपणाने आपले विचार मांडले.
भक्तांचे रक्षण करण्यासाठी खुद्द भगवंतांना "कूर्म' जन्मी यावे लागले हा उल्लेख पोथी, पुराण - आरत्यांत सापडतो. मात्र आधुनिक काळात कासवांचेच रक्षण करण्यासाठी मानव खूप प्रयत्नशील असल्याचा अनुभव पणजीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय कासव बचाव व संवर्धन परिषदेत आल्यावाचून राहत नाही.
जागतिक स्तरावरील ७० देशातील ७०० प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दक्षिण पूर्व आशियाई देशांतील प्रतिनिधींची संख्या १० पटीने जास्त आहे. याच कारणामुळे जगातील प्रख्यात जीवशास्त्रज्ञ, संवर्धनवादी, बिगर सरकारी संघटना, विद्यार्थी, ऍकॅडमिक संशोधक २४ एप्रिलपासून कला अकादमीत एकत्र आले असून कासवांचे संवर्धन व रक्षण यावर आपल्या ज्ञानाची, अनुभवाची व तंत्रज्ञाची देवाणघेवाण करीत आहेत. यंदाच्या परिषदेचा विषय "कासवांचे जग' असा आहे.
श्री. शंकर यांनी आपल्या समुद्री कासवांबद्दलचे प्रेम आणि त्यांच्या रक्षणासंबंधीची आवश्यकता यावर माहिती दिली. मात्र शंकर हे जैविक विविधता, समुद्रातील जीवशास्त्र आणि पर्यावरणासंबंधीच्या सरकारच्या आस्थाहीन भूमिकेवर नाराज आहेत. या कार्यासाठी सरकारने योग्य प्रमाणात अंदाजपत्रकात तरतूद केलीच पाहिजे असे त्यांचे आग्रही मत आहे. "समुद्रातील कासवांच्या संरक्षणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघणे आवश्यक आहे'.
कोणत्याही जागेचा विकास योजनाबद्ध असला पाहिजे. गोव्यातील किनारी नियमन विभागाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे ही चांगली बाब आहे. हे धोरण आखल्यामुळे पर्यावरण व निसर्गाला द्वितीय स्थान तर मच्छीमारीला तृतीय स्थान प्राप्त झाले आहे. अनेक वनस्पती व प्राणी लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याने आमच्या नियोजकांनी पर्यावरण संरक्षण, समुद्री जैविक विविधता रक्षणासंबंधी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गेल्या ३० वर्षांत ही परिषद अमेरिका, मलेशिया, कॉस्ता रीका, ग्रीस, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या देशातून फिरून आता भारतात पोहोचल्याबद्दल शंकर यांनी समाधान व्यक्त केले.
ही परिषद आंतरराष्ट्रीय समुद्र कासव सोसायटीने केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालय, भारतीय विज्ञान संस्था, राष्ट्रीय जैविकशास्त्र विज्ञान, मद्रास क्रोकोडाईल पार्क बॅंक ट्रस्ट, फाउंडेशन ऑफ इकॉलॉजिकल रिसर्च, दक्षिण फाऊंडेशन आदींच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे.२७ ते ३० एप्रिलपर्यंत जीवसृष्टी आणि पर्यावरणावरील परिणाम यावर खास सत्रासह १०० जणांचे प्रबंधवाचन आणि २५० पोस्टर्सचे प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे.
समुद्रातील ज्ञात असलेल्या सर्व सातही जाती सध्या धोकादायक जाती कायद्यात समाविष्ट आहेत. समुद्री कासवांना पकडणे, यांत्रिकी मच्छीमारी जाळ्यात कासव अडकणे, किनारी भागांचा अनियोजित विकास, कासवांच्या कवचाचा दागिन्यांसाठी वापर, कातडीचा विविध उपयोगांसाठी वापर अशा अनेक कारणामुळे समुद्री कासवांची संख्या रोडावत चालली आहे. समुद्रातील कासव हे पर्यावरणीय रचनेचे एक महत्त्वाचे घटक आहेत. ज्यात मानव, महासागर आणि किनाऱ्यांचा अंतर्भाव होतो. महासागरात राहणारे हिरवे समुद्री कासव समुद्राच्या तळावर निर्माण होणारे गवत भक्षण करतात. अशा प्रकारच्या गवताची वाढ मासे व इतर समुद्री जीवांच्या आरोग्यासाठी कमी प्रमाणात राहणे लाभदायक असते. समुद्र किनाऱ्यांवर रेतीची झीज टाळण्यासाठी व वाळूचे ढिगारे राखण्यासाठी कासवांचे संवर्धन अत्यावश्यक आहे. न उबविलेली अंडी व उबवून झाल्यानंतर राहिलेले अंड्यांचे अवशेष हे वाळूच्या ढिगाऱ्यांच्या वाढीसाठी एक पौष्टिक स्त्रोत आहे. समुद्री कासवाचे आयुष्य ८० वर्षे असल्याचे मानले जाते.

No comments: