Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 27 March, 2010

"धारबांदोड्या'च्या निर्णयामुळे सामन्यांना मिळाला दिलासा


निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत


कुळे, दि. २६ (वार्ताहर)- गोव्यातील १२ व्या धारबांदोडा तालुक्याची निर्मिती करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे सावर्डे मतदारसंघातील अनेक मान्यवरांनी स्वागत केले आहे. सदर निर्णयामुळे संपूर्ण मतदारसंघात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शक्य तेवढ्या लवकर तालुक्याची निर्मिती करावी, जेणेकरून येथील लोकांना अनेक अडचणींपासून मुक्तता मिळेल व सर्व बाबतीत सोयीस्कर होईल, अशी मागणी करण्यात आली आहे.
माजी आमदार विनय तेंडुलकर यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सदर तालुक्याच्या निर्मितीसाठी आपण यापूर्वी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याची आठवण करून दिली. कुळे, मोले, काले आदी ग्रामीण भागातील लोकांचे होणारे अतोनात हाल लक्षात घेऊन सदर मागणी करण्यात होती. सदर मागणी मान्य झाल्याबद्दल समाधान होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कुळे पंचायतीचे सरपंच संदीप देसाई यांनी संपूर्ण पंचायतीच्या वतीने सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. सहा महिन्यांपूर्वी सावर्डे मतदारसंघांतील सर्व पंचायतींनी याविषयी सरकारकडे मागणी केल्याचे नमूद करताना मोले ते उसगाव तिस्क या महामार्गावर होणारी वाहतुकीची प्रचंड कोंडी लक्षात घेऊन सरकारने योग्य ठिकाणी तालुका कार्यालय स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. सरकारने धारबांदोडा तालुक्याची निर्मिती करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे आपण आनंदीत आहे, ग्रामस्थांच्या वतीने सरकारचे आपण अभिनंदन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोले पंचायतीचे सरपंच गोविंद गावकर यांनी सदर निर्णयाचे स्वागत करून आज झालेल्या मासिक बैठकीत पंचायतीने सरकारच्या अभिनंदनाचा ठराव संमत केल्याचे सांगितले. या निर्णयामुळे आसपासच्या लोकांना फार मोठा दिलासा मिळाला असून त्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केल्याचे ते म्हणाले.
साकोर्डा पंचायतीच्या सरपंच योगिता नाईक यांनी या निर्णयाचे स्वागत करताना खास करून महिला वर्गाला याचा जास्त फायदा होईल अशी आशा व्यक्त केली. आपण सर्व ग्रामस्थ व पंचायत मंडळाच्या वतीने सरकारचे अभिनंदन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कुळे नागरिक समितीचे अध्यक्ष संतोष मसूरकर यांनी सरकारने एक महत्त्वाचा असा निर्णय घेताना परिसरातील लोकांना फार मोठा दिलासा दिल्याचे मत व्यक्त केले. या निर्णयामुळे अनेक अडचणींपासून मुक्तता मिळणार असून आपण कुळे नागरिक समितीच्या वतीने सरकारचे अभिनंदन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदरीत सर्व मतदारसंघातून सरकारच्या निर्णयाचे स्वागत होत असले तरी सामान्य लोकांनी व खास करून कुळे, काले व मोले येथील लोकांनी मोले ते तिस्क उसगाव महामार्गावर होणारी प्रचंड वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन या सर्व परिसरातील लोकांना सोयीस्कर होईल अशा ठिकाणीच तालुका कार्यालय स्थापन करण्याची मागणी केली आहे.

No comments: