Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 26 March, 2010

ज्येष्ठ रंगकर्मी मोहन वाघ यांचे निधन

मुंबई, दि. २५ : नाट्यनिर्मिती, नेपथ्य आणि छायाचित्रण यातील "बाप माणूस' समजले जाणारे ज्येष्ठ रंगकर्मी मोहन वाघ यांचे आज दुपारी दीर्घ आजारानंतर निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.गेल्या काही दिवसांपासून कानामध्ये इन्फेक्शन झाल्याने त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार केले जात होते. उपचारानंतर ते विश्रांतीसाठी आपले जावई राज ठाकरे यांच्या घरी वास्तव्यास होते. पण, आज दुपारी ठाकरे यांच्या निवासस्थानीच वाघ यांची प्राणज्योत मालवली. मे महिन्याच्या अखेरीस अमेरिकेतील न्यू जर्सी येथे होणाऱ्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ते भूषविणार होते. त्यांच्या जाण्याने सांस्कृतिक जगतावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या मागे पत्नी पद्मश्री, मुली शर्मिला आणि अपर्णा तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची मुलगी शर्मिला हिचा विवाह राज ठाकरे यांच्याशी झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मोहन वाघ यांचे अतिशय जवळचे मित्र मानले जात होते. नात्यात गुंफल्यानंतर हे संबंध अधिकच दृढ झाले होते. वाघ यांचे पार्थिव लगेचच मकरंद सोसायटी येथील त्यांच्या निवासस्थानी आणले गेले. दादर येथील त्यांच्या निवासस्थानी असंख्य चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दादरच्या स्मशानभूमीवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांपैकीच असणारे राज ठाकरे, मुलगी शर्मिला यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
सिद्धहस्त नाट्यनिर्माते
त्यांच्या हातात नाटक गेले म्हणजे ते फक्त यशस्वीच नाही तर विक्रम करणार, अशी आशा निर्माण व्हायची. "चंद्रलेखा' या आपल्या नाट्यसंस्थेतर्फे त्यांनी अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती केली. केवळ चांगले नाटक करून भागत नाही तर ते लोकांपर्यंत पोचवावे लागते, हे त्यांनी पुरेपूर जाणले होते. म्हणूनच ते आपल्या नाटकांमध्ये आणि नाटकांच्या लोकप्रियतेसाठी अभिनव प्रयोग सातत्याने करीत असत.
त्यांनी "स्वामी' या नाटकाचा प्रयोग शनिवार वाड्यावर केला. "गुलमोहर'चा प्रयोग विक्रांत बोटीवर केला. शेक्सपिअरच्या नाटकांवर आधारित "गगनभेदी' या नाटकाचा प्रयोग थेट शेक्सपिअरच्या जन्मगावी स्टॅंटफर्ड येथे रंगविला. पानिपतच्या युद्धावर आधारित "रणांगण'चे संहितापूजन पानिपतच्या युद्धभूमीवर केले.
नाट्यनिर्मितीसोबतच मोहन वाघ हे नेपथ्यकार म्हणूनही प्रख्यात होते. त्यांचे नेपथ्य इतके उत्कृष्ट होते की, पडदा उघडताक्षणीच प्रेक्षक नेपथ्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करीत असत. वास्तविक, आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी छायाचित्रणापासून केली. मूळचे कारवार येथील असणारे मोहन वाघ यांना "पाकिजा' या चित्रपटासाठी उत्कृष्ट डिझाईनचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. शिवाय "जीवन गौरव'नेही त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी आपल्या एकूण कारकिर्दीत तब्बल ८२ नाटके रंगभूमीवर आणली. त्यातही रणांगण, स्वामी, बटाट्याची चाळ, ऑल द बेस्ट ही नाटके तुफान गाजली. प्रेमगंध, बहुरूपी आणि एक तिकीट सिनेमाचं ही नाटके तर उत्कृष्ट नेपथ्यामुळेही गाजली. नेपथ्यामुळे नाटक गाजविण्याचाही विक्रम मोहन वाघ यांनी प्रस्थापित केला.
उत्कृष्ट "कॅमेरादृष्टी'
रंगमंचासोबतच त्यांनी कॅमेरा हे माध्यमही अतिशय समर्थपणे पेलले. फोटोग्राफीची अत्यंत आवड असणाऱ्या लतादीदींनी तर याचे धडे मोहन वाघ यांच्याकडून गिरविले. दीदींसह असंख्य तारे-तारका आणि सुनील गावस्कर यांच्यासारखे क्रिकेटपटू मोहन वाघ यांना आपल्या जिव्हाळ्याच्या आप्तेष्टांपैकी मानत असत. त्यामुळे या दिग्गजांचे वेगवेगळे मूड वाघ यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपता आले आणि ते त्यांनी लोकांसमोर आणले. कोणत्याही फोटोग्राफरला आपले छायाचित्र घेऊ देण्यास सहजासहजी परवानगी न देणारे हे सर्व दिग्गज मोहन वाघ यांच्या कॅमेऱ्याला पुरेपूर सहकार्य करीत असत. वाघ यांच्यामुळेच मधुबाला, नर्गिस, वैजयंतीमाला या गाजलेल्या अभिनेत्रींची विलोभनीय छायाचित्रे लोकांसमोर येऊ शकली.

No comments: