Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 27 March, 2010

"गोवा अर्बन बॅंके'च्या ७ संचालकांचे राजीनामे

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी)- गोवा अर्बन सहकारी बॅंकेच्या कर्मचारी व अधिकारी संघटनेतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या २९ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीच्या पार्श्वभूमीवर बॅंकेचे अध्यक्ष विष्णू नाईक, उपाध्यक्ष बी. एम. व्ही. पी. फर्नांडिस व इतर पाच संचालकांनी थेट आपल्या पदांचा राजीनामाच सादर करून या संपाला आव्हान दिल्याने आता बॅंकेसमोर नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
बॅंकेचे अध्यक्ष विष्णू नाईक, उपाध्यक्ष श्री. फर्नांडिस, संचालक डी. बी. एस. कुडचडकर, चंद्रकांत चोडणकर, आर. एन. लवंदे, श्रीमती एम. आर. परेरा व पी. ए. कवळेकर यांनी संचालकपदाचे राजीनामे सहकार निबंधकांकडे सादर केले आहेत. दरम्यान, या राजीनामा नाट्यावर उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी कर्मचारी व अधिकारी संघटनेची महत्त्वाची बैठक आज पणजीत झाली. या बैठकीत या परिस्थितीवर सखोल विचार करण्यात आला. गेली सात वर्षे केवळ बॅंकेच्या हितासाठी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी हट्ट केला नाही किंवा बॅंकेची बदनामी होईल, अशी कोणतीही कृती केली नाही. पण आता मात्र बॅंक व्यवस्थापनाच्या अरेरावीला काहीही मर्यादा राहिलेली नाही. त्यांच्याकडून सुरू असलेल्या अन्यायाला काहीच पारावार राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया बहुतांश संघटनेच्या नेत्यांनी व्यक्त केली. वेतन कराराचे नूतनीकरण व इतर आवश्यक सुविधा देण्याचे लेखी मान्य करीत असल्यास हा संप मागे घेऊ अशी भूमिका व्यवस्थापनाकडे मांडली; परंतु ही मागणी मान्य करण्यास बॅंक सरव्यवस्थापकांनी नकार दिल्याने संपाचा निर्णय कायम ठेवण्याचे संघटनेतर्फे ठरण्यात आल्याची माहिती सुभाष नाईक जॉर्ज यांनी दिली. २९ रोजी सर्व कर्मचारी व अधिकारी बॅंकेच्या मुख्यालयासमोर एकत्र येणार आहेत व त्यावेळी पुढील कृतीबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, विष्णू नाईक व इतर संचालकांनी आपला राजीनामा सहकारी निबंधकांकडे पाठवला आहे. सहकार कायद्याअंतर्गत संचालकांनी राजीनामा दिल्याचे सांगून संचालक मंडळ अल्पमतात आल्याचे राजीनामापत्रात नमूद करून पुढील कारवाई सहकार निबंधकांनी करावी, असे कळवण्यात आले आहे. कर्मचारी संघटनेने या राजीनामा नाट्याचा निषेध केला आहे. कर्मचाऱ्यांना त्यांचे न्याय्य हक्क द्यावे लागणार म्हणून राजीनामा देऊन पळ काढणे ही कृती आक्षेपार्ह आहे. आता सरकारनेच याप्रकरणी योग्य तो निर्णय घ्यावा, असेही आवाहन केले आहे. बॅंकेचे ग्राहक, ठेवीदार तथा भागधारकांनी या घटनेमुळे अजिबात घाबरून जाण्याचे कारण नाही. बॅंकेचे कर्मचारी व अधिकारी आपल्या जबाबदारीशी पूर्णपणे प्रामाणिक आहेत व ठेवीदार, भागधारक यांचे हित जपण्याचे भान त्यांना आहे. केवळ राजीनामा नाट्य करून भागधारकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा हा संचालक मंडळाचा प्रयत्न निव्वळ फार्स आहे, असेही कळवण्यात आले आहे.

No comments: