Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 27 March, 2010

मद्य घोटाळ्यात मुख्यमंत्रीच सामील असण्याची शक्यता

राजेंद्र आर्लेकर यांचा घणाघाती आरोप

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी अबकारी खात्यातील उघडकीस आणलेल्या ६० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्यास सरकार टाळाटाळ करीत असल्याने या घोटाळ्यात मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री दिगंबर कामत स्वतःच सामील असल्याची शक्यता आज भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते तथा माजी आमदार राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केली आहे. सरकार "सीबीआय' चौकशी करण्यास तयार नसल्यास या घोटाळ्याची सभागृह समिती स्थापन करून चौकशी केली जावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
ते आज पणजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याचबरोबर पक्षाचे सचिव तथा माजी आमदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.
या घोटाळ्याची चौकशी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विरोधी पक्षनेत्यांनी पुराव्यांनिशी हा घोटाळा उघडकीस आणला आहे. तरीही मुख्यमंत्री या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यास का तयार होत नाहीत? या बाबतीत ते टाळाटाळ करत असल्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून मुख्यमंत्र्यांनी तो दूर करण्याची गरज असल्याचे ते पुढे म्हणाले. या घोटाळ्यात कोण कोण गुंतलेले आहेत याचा पर्दाफाश झालाच पाहिजे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून याची संपूर्ण जबाबदारी दिगंबर कामत यांच्यावर येत आहे. या घोटाळ्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान गोव्याला सोसावे लागले आहे. हा जनतेचा पैसा कोणी आपल्या घशात घातला, याची चौकशी करण्यासाठी सभागृह समिती स्थापन केलीच पाहिजे, असे श्री. आर्लेकर म्हणाले.
आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे वाढदिवस साजरे करण्यात व्यस्त असून आरोग्य खात्यात किती भोंगळ कारभार चालला आहे, याची कल्पनाही त्यांना नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला. काल म्हापसा येथील आझिलो इस्पितळात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बाळंतिणीला आपला प्राण गमवावा लागला. तर, एका महिलेची इस्पितळाच्या "बाथरूम'मध्येच प्रसूती झाली. या दोन घटनांवरून आरोग्य खात्याचेच आरोग्य बिघडल्याचे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांत आरोग्यमंत्र्यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्पिसियो आणि आझिलो इस्पितळाचा दर्जा सुधारण्यासाठी काय काय केले आहे ते उघड करावे, असे आव्हान यावेळी श्री. आर्लेकर यांनी दिले.
गेल्या सहा दिवसांपासून मलेरिया सर्वेक्षक पणजीत उपोषणाला बसले आहेत. त्यांची साधी दखलही आरोग्यमंत्र्यांनी घेतली नसल्याची टीका यावेळी त्यांनी केली. मंत्री केवळ जनतेच्या पैशांवर विमानांतून दौरे करण्यात व्यस्त आहेत. आरोग्यमंत्री राणे यांनी ताबडतोब या सर्वेक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांना असे उघड्यावर सोडणे योग्य होणार नाही, असेही ते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली "सायबर एज' योजना कॉंग्रेसच्या कामत सरकारने बंद केल्याने यावेळी श्री. आर्लेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दिगंबर कामत भाजप सरकारमध्ये असताना या योजनेबद्दल बोलताना म्हणत होते की "आम्ही लोकांच्या घरोघरी संगणक पोहोचवले. कॉंग्रेस सरकार तर संगणकांचे खोकेही देणार नाही.' ही योजना बंद करून त्यांनी आपले ते शब्द तंतोतंत खरे केले असल्याचा टोमणाही त्यांनी लगावला.

No comments: