Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 2 August, 2008

दहशतवाद रोखा, पंतप्रधानांनी पाकला सुनावले

कोलंबो, दि.२ : दहशतवादी कारवाया ताबडतोब रोखण्यास भारताने पाकिस्तानला सांगितले आहे. कोलंबोमध्ये आजपासून १५ व्या सार्क शिखर परिषदेला सुरुवात झाली. या दोन दिवसीय परिषदेत पहिल्याच दिवशी भारताने दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून संपूर्ण जगाला या मुद्दावर एकजूट होण्याचे आवाहन केल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत असलेल्या पाकिस्तानला खडे बोल सुनावून दहशतवादी कारवाया रोखण्यास सांगितले आहे.
""पाकच्या भूमीवरून दहशतवादी कारवाया करण्याची परवानगी कदापिही दिली जाणार नाही, भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध यापुढेही कायम राहावेत, यासाठी दहशतवादमुक्त वातावरणाची निर्मिती केली जाईल, असा शब्द आपण पत्राद्वारे लेखी दिला होता. या शब्दाशी कटिबद्ध असल्याचेही आपण म्हटले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. आपल्या भूमीवरून भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया सातत्याने सुरूच आहेत. दहशतवाद रोखण्याविषयी आपण जी इच्छा दाखविली होती, जो लेखी शब्द दिला होता, त्याची अंमलबजावणी करावी,''असे भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानला म्हटले आहे.
""पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादी कारवाया करू दिल्या जाणार नाहीत, असा लेखी शब्द पाकने दिला होता. या शब्दाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली असल्याचे पाहायला आम्हाला आवडेल. दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यासाठी पाकिस्तानने दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे,''असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी श्रीलंकेतील एका वर्तमान पत्राला मुलाखत देताना म्हटले. त्यांची ही मुलाखत आज प्रकाशित झालेली आहे.
""पाकिस्तानसमवेत शांततापूर्ण, मैत्रीपूर्ण आणि सहकार्याचे संबंध प्रस्थापित करण्यास भारत इच्छूक आहे. काश्मीरप्रश्नासह उभय देशांमधील प्रलंबित मुद्दे सामोपचाराने, सामंजस्याने, द्विपक्षीय चर्चेच्या मार्गाने सोडविण्याविषयी आम्ही कटिबद्ध आहोत. पाकसोबतच्या संबंधांत सुधारणा होण्यासाठी दहशतवादमुक्त वातावरण निर्माण होण्याची आवश्यकता आहे. सुरक्षात्मक वातावरणात आपापल्या देशांमधील नागरिकांची प्रगती होण्यासाठी दहशतवादमुक्त वातावरण प्रस्थापित करणे, ही आपली जबाबदारी आहे,''असेही पंतप्रधानांनी या मुलाखतीत म्हटले आहे.
दहशतवाद हा सर्वात मोठा धोका
"संपूर्ण जगातील स्थैर्यासाठी सद्यस्थितीत दहशतवाद हा सर्वात मोठा धोका बनलेला आहे. दहशतवादाची पाळेमुळे सर्वत्र खोलवर रूजलेली आहेत. या भीषण समस्येविरुद्ध लढा देण्यासाठी जगभरातील देशांना एकजूट व्हावेच लागणार आहे,''असे आवाहन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज केले. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे आजपासून सुरू झालेल्या १५ व्या "सार्क' (साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल को-ऑपरेशन )शिखर परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. "सार्क'च्या व्यासपीठावरून दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करताना पंतप्रधानांनी काबूलमधील गेल्या महिन्यात भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्याचा तसेच बंगलोर आणि अहमदाबाद शहरांमध्ये लागोपाठ झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांचा उल्लेख केला.
कोलंबो येथील १५ व्या "सार्क' शिखर संमेलनात पंतप्रधानांनी दहशतवादाचा मुद्दा जोरकसपणे उचलून धरल्याने दहशतवादाला रोखण्याविषयीचा मुद्दा या शिखर परिषदेत महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे. यजमान श्रीलंका, भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये नुकत्याच काही मोठ्या दहशतवादी घटना घडलेल्या आहेत. या दहशतवादी घटनांमुळे "सार्क' परिषदेत यावेळी एक मोठा बदल झाला असल्याचे दिसून येत आहे, असेच मानले जात आहे.
""दक्षिण आशियामध्ये दहशतवादाच्या समस्येने डोके किती वर काढलेले आहे, हे आपण काबूलमधील भारतीय दूतावासावर झालेला हल्ला, बंगलोर, अहमदाबादमधील बॉम्बस्फोट मालिकांच्या रूपाने पाहिलेले आहे. दहशतवादाविरुद्ध सुरू केलेली लढाई हरणे आपण सहन करू शकणार नाही. या समस्येविरुद्ध एकत्रितपणेच लढा द्यावा लागेल. आपल्या सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचवू पाहणाऱ्यांना एकजुटीने ठोस प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे,''असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी दोन दिवसांच्या सार्क परिषदेला संबोधित करताना म्हटले. या परिषदेला पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांच्यासह श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान, मालदिव आणि अफगाणिस्तानचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गिलानींना भेटले
काबूलमधील भारतीय दूतावासावर झालेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचे उघडकीस आले होते. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न करताना भारतीय टेहळणी चौकींवर गोळीबार करून शस्त्रसंधीचा भंग केला होता. कारगिलनंतर झालेली ही सर्वात मोठी घुसखोरी होती. या घटनेनंतर पाकने पुन्हा गोळीबार केला होता. या घटनाक्रमांविषयी भारताची चिंता व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांची भेट घेतली.

No comments: