Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 30 July, 2008

सुरतमध्ये आणखी दोन बॉम्ब सापडले, दहशत कायम

अतिरेकी कारवायांची माहिती देणाऱ्यास ५१ लाखांचे बक्षीस
बॉम्बची माहिती देणाऱ्या नागरिकांना २१ हजारांचे बक्षीस
गुजरातचा आर्थिक कणा तोडणे
हेच अतिरेक्यांचे लक्ष्य : मोदी

सूरत, दि.३० : सुरत हे गुजरातमधील हिऱ्यांच्या व्यापाराचे मुख्य शहर आहे. सोबतच अन्य काही महत्त्वपूर्ण उद्योगही येथे चालतात. गुजरातमधील आर्थिक उलाढालीचे केंद्र म्हणजे हे शहर आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर बॉम्ब पेरणे म्हणजे गुजरातचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रयत्न होय आणि अतिरेक्यांचे लक्ष्य कदाचित हेच असावे, असे प्रतिपादन करीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अतिरेकी कारवायांविषयी महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्यास ५१ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.
ुसुरतमध्ये मंगळवारी १८ जिवत बॉम्ब सापडल्यानंतर ते सर्व निकामी करण्यात आले असतले, तरी बुधवारी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे सुरतच्या दौऱ्यावर असतानाच आणखी एक जिवंत बॉम्ब सापडल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. हा बॉम्ब आधीच ठेवण्यात आला होता की नरेंद्र मोदी येणार म्हणून आज मुद्दाम पेरण्यात आला याबाबत काहीही समजू शकले नाही.
सुरत शहरात सतत बॉम्ब सापडत असल्याने शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली असून, बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला त्यांचे कार्य सुरळीत करता यावे आणि पोलिसांना योग्यरित्या तपासणी करण्यात यावी यासाठी सुरतमधील सर्व शैक्षणिक संस्था, मॉल्स आणि इतर प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती.
मुख्यमंत्री मोदी यांनी आज शहरात जाऊन ज्या-ज्या ठिकाणी बॉम्ब सापडले तेथील पाहणी केली. वरछा या ठिकाणी काल सर्वाधिक बॉम्ब सापडले. परिसरातील लोकांशीही त्यांनी चर्चा केली. प्रत्येक ठिकाणी घटनेची माहिती त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मोदी म्हणाले की, लोकांची जागरूकता आणि पोलिसांची तत्परता यामुळेच शहरातील मोठा अनर्थ टाळता आला. जिथे-जिथे बॉम्ब सापडले त्या प्रत्येक ठिकाणच्या लोकांनी याविषयीची सूचना पोलिसांना दिली. सर्वप्रथम माहिती देणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी २१ हजार रुपयांचे बक्षीस राज्य शासनातर्फे दिले जाणार आहे.
सुरत हे शहर मुख्यत्वेकरून हिऱ्याच्या कारभारासाठी देशातच नव्हे, तर विदेशातही प्रसिद्ध आहे. गुजरातमधील बऱ्याच उद्योगांचे सुरत आणि अहमदाबाद हे माहेरघर आहे. येथे घातपात घडवून राज्याचा आर्थिक विकास थोपवून धरण्याचा अतिरेक्यांचा कट होता. केवळ गुजरातच नव्हे तर बंगलोर, मुंबई, जयपूर, हैद्राबाद ही ठिकाणेही देशाच्या आर्थिक तसेच औद्योगिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहेत. येथे घातपात घडवून आणण्याच्या प्रयत्नातून अतिरेक्यांचे मनसुबे स्पष्ट होतात. गेल्या दोन वर्षात जवळपास १२ मुख्य ठिकाणी अतिरेकी हल्ले झाले. बॉम्ब पेरणे आणि त्या माध्यमातून निरपराधांचे प्राण घेणे हे अतिरेक्यांचे छुपे युद्ध आहे, असे मोदी म्हणाले.
नागरिकांनी या काळात संयमाने राहून "छुप्या' शत्रूचा हेतू उधळून लावायचा आहे. गुजरातमधील हल्ले कोणी करविले, याविषयीची चौकशी सुरूच आहे. तपास पूर्ण झाल्यावर सत्य बाहेर येईलच. पण, लोकांनी या काळात पोलिस आणि प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे, असेही आवाहन मोदी यांनी केले. यापुढे अशा कोणत्याही मोठ्या घातपाताशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल आणि त्या व्यक्तीला ५१ लाखांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणाही मोदी यांनी यावेळी केली.

No comments: