Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 27 July, 2008

गोव्याच्या सुरक्षेसाठी
केंद्रीय राखीव दलाच्या
तीन तुकड्या पाचारण

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - बंगलोर येथे साखळी बॉंम्बस्फोट झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गोव्याच्या सुरक्षेविषयी आढावा घेण्यासाठी बोलावलेली बैठक सुरू असतानाचा सायंकाळी ६.४५ वाजता गुजरात येथील अहमदाबाद येथे साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यामुळे गोव्यात २९ जुलै ०८ पर्यंत "रेड अलर्ट' कायम ठेवण्यात आला आहे. तसेच सप्टेंबरमध्ये येणाऱ्या चतुर्थीला खास सुरक्षा ठेवण्यासाठी केंद्रीय राखीव दलाच्या तीन तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. गोव्यातील सर्व समुद्र किनाऱ्यावर व चेक नाक्यांवर कडक सुरक्षा ठेवून सर्व वाहनांची कसून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या दोन्ही साखळी बॉंम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात कडक सुरक्षा ठेवण्यात येणार असल्याचे कामत यांनी सांगितले. या बैठकीत मुख्यमंत्र्यांबरोबर गृहमंत्री रवी नाईक, मुख्य सचिव जे. पी. सिंग, पोलिस महासंचालक बी. एस. ब्रार व पोलिस महानिरीक्षक किशन कुमार उपस्थित होते.
गोव्याच्या सुरक्षेबाबत सर्वतोपरी दक्षता घेतली जाणार असल्याचे पोलिस महानिरीक्षक कुमार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राज्यातील प्रमुख शहरांत आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पोलिस गस्त वाढवली जाणार असल्याचे ते म्हणाले.

No comments: