Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 27 July, 2008

"जयराम कॉम्प्लेक्स'
मलेरियाच्या विळख्यात
बिल्डरकडून कायदा धाब्यावर बसवल्याचा आरोप

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - पणजी नेवगीनगर येथील "जयराम कॉम्लेक्स' वसाहत पूर्णपणे मलेरियाच्या विळख्यात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे. या परिसरात नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असून डासांच्या पैदाशीला पूरक असे वातावरण बनल्याने तेथे मलेरियाची साथ फैलावत चालले असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. सध्या दोघा रहिवाशांना मलेरियाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मलेरियाच्या साथीमुळे या वसाहतीतील निवासी पूर्णपणे हादरले असून आरोग्य खातेही या गोष्टीकडे कानाडोळा करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
पणजी मळा येथील नेवगी नगर भागात "जयराम कॉम्लेक्स' हे रहिवासी व व्यापारी संकुल "मेसर्स कुडतरकर रिअल इस्टेट प्रा. ली' यांच्या मालकीचे आहे. या परिसरात सुमारे १६० रहिवासी तथा व्यापारी विभाग असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ सुरू असते. दरम्यान, रहिवाशांना अंधारात ठेवून सध्या या बिल्डरने आणखी एका नव्या इमारतीचे बांधकाम चालवले असून तेथे स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीच काळजी घेतली नसल्याने मोठ्या प्रमाणात डासांची पैदास सुरू असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तेथे कामगारही हलाख्याच्या परिस्थितीत राहत असून आरोग्याच्या दृष्टीने त्यांना कोणतीही सुविधा प्रदान करण्यात आल्या नसल्याने त्यांनाही मलेरियाची लागण होण्याची शक्यता असल्याचे त्या किाणी बोलावलेल्या वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना त्यांनी सांगितले.
या एकूण परिस्थितीबाबत रहिवाशांनी संबंधित सरकारी यंत्रणांच्या पायऱ्या झिजवूनही त्यांचे म्हणणे कोणीच एकूण घेण्याच्या मनःस्थितीत नाही. सदर बिल्डरचे विद्यमान सरकारात बड्या राजकीय नेत्यांशी संबंध असल्याने सर्व कायदे धाब्यावर बसवून त्यांनी मनमानी कारभार चालवल्याचा आरोप येथील एक रहिवाशी डॉ. गोविंद कामत यांनी केला आहे. या परिसरातील अनेक लोक आपल्याकडे रक्त तपासणीसाठी येतात व त्यांना मलेरियाची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाल्याचे मणिपाल इस्पितळाच्या पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.सूद यांनी पत्रकारांना सांगितले. पत्रकारांनी स्वतः या परिसराची पाहणी केली असता तेथे केवळ मलेरियाच नव्हे तर चिकुनगुनिया व डेंग्यूगी पसरण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मलेरियाबाबत कडक धोरण अवलंबल्याची घोषणा केली असली तरी आता त्यांनी प्रत्यक्ष कृती करावी; अन्यथा ही परिस्थिती आटोक्यात येणे कठीण होणार असल्याचे ते म्हणाले.
आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही बिल्डरकडून हयगय झाल्यास प्रसंगी त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला खरा; परंतु राजकीय गोतावळ्यात वावरणाऱ्या बिल्डरांवर कारवाई करण्याचे धाडस ते खरोखरच करतील काय, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना याप्रकरणी अनेकवेळा कळवूनही त्यांनीही प्रतिसाद न दिल्यामुळे या आम्हाला कोणीच वाली राहिला नसल्याची खंत तेथील लोकांनी व्यक्त केली. गोव्यात इतर राज्यांप्रमाणे "फ्लॅट'मालक सुरक्षा कायदा अस्तित्वात नसल्याने तो त्वरित अमलात आणावा अशी मागणी सरकारकडे केली होती; परंतु हा कायदा बिल्डरांसाठी डोकेदुखी ठरणारा असल्याने त्यांचे हित पाहून सरकार जाणीवपूर्वक हा कायदा अमलात आणत नसल्याची टीकाही डॉ. कामत यांनी केली.

No comments: