Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 27 July, 2008

"कॉंग्रेसच्या राजवटीत देश असुरक्षित'

भाजपची निषेध सभा
पणजी, दि.27 (प्रतिनिधी)- आजपर्यंत केवळ खोटारडेपणा व पैशांच्या बळावर राजकारण करणाऱ्या कॉंग्रेसने संसदही विकत घेतली आहे. देशाचा स्वाभिमान अमेरिकेकडे गहाण ठेवणाऱ्या अणूकराराला मान्यता मिळवून देण्यासाठी कोट्यवधींची आमिषे दाखवून खासदारांना विकत घेणाऱ्या कॉंग्रेसच्या राजवटीत भारत देश नक्कीच सुरक्षित नाही, असे उद्गार भाजपचे राष्ट्रीय सचिव तथा अरुणाचल प्रदेशचे खासदार किरेन विजेजू यांनी काढले.
गेल्या 22 जुलै रोजी संसदेत विश्वासमत ठरावावेळी केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने पैशांचा बाजार मांडून संसदेची शान व प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याच्या निषेधार्थ प्रदेश भाजपतर्फे आज एका खास जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. पर्वरी आझाद भवन सभागृहात खचाखच भरलेल्या या सभेत खासदार विजेजू यांनी कॉंग्रेसकडून देशाची कशा पद्धतीने वाट लावणे सुरू आहे, याचे अनेक किस्सेच सादर केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक, उपाध्यक्ष केशव प्रभू, कुंदा चोडणकर इतर पदाधिकारी मंगलदास गांवस, मनोहर आडपईकर,सदानंद शेट तानावडे,राजेंद्र आर्लेकर, इब्राहिम मुसा, मुक्ता नाईक, नरेंद्र सावईकर आदी हजर होते. व्यासपीठावर भाजपचे आमदार फ्रान्सिस डिसोझा, दामोदर नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर, अनंत शेट, मिलिंद नाईक, दयानंद सोपटे, दिलीप परूळेकर, दयानंद मांद्रेकर हेही उपस्थित होते.
विजेजू यांनी आपल्या भाषणाला सुरुवातच करताना लोकसभेचा खासदार म्हणवून घेणे ही सुद्धा आता शरमेची गोष्ट बनल्याचे सांगितले. लोकशाहीचे पवित्र स्थान म्हणून ज्या संसदेची प्रतिष्ठा व मान होता तो कॉंग्रेसने आपल्या गलिच्छ राजकारणाने पूर्णपणे घालवल्याची टीका त्यांनी केली. पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग व कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या अमेरिकेच्या दलाल बनल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. 1980 साली गरिबी हटावचा नारा कॉंग्रेसने दिला व तेव्हापासून आत्तापर्यंत गरिबीचा आकडा वाढतच आहे. चीनकडून अरुणाचल प्रदेशावर आपला हक्क सांगितला जात असताना तेथील दूतावासाला साधी समज देण्याचे भानही कॉंग्रेस सरकारला राहिले नाही. उत्तरेत सीमाभागात राहणारे लोक आपला जीव मुठीत धरून दिवस काढीत आहेत. अटलबिहारी वाजपेयींसारखे खंबीर व देशाचा स्वाभिमान जागवणारे नेतृत्व त्यांना हवे आहे व ते पूर्ण करण्यासाठी विकसीत राज्यातील सुशिक्षित लोकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
गोवा हे साक्षरता व जीवनमानाच्या अनुषंगाने पुढारलेले राज्य आहे व इथे जागृतीचे प्रमाणही जास्त आहे असे असताना येथील मतदारांनी कॉंग्रेसच्या वाटेने दिलेला कौल हा त्यांच्या भ्रष्टाचाराला दिलेली मान्यता असल्याचे ते म्हणाले. गोवेकरांनी या पैशांच्या राजकारणाला जर थारा दिला तर गरीब व मागासलेल्या राज्यातील लोकांनी कुणाकडे आशेने पाहावे,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. देशाच्या उत्तरी भागात मोठ्या प्रमाणात बंागलादेशींची घुसखोरी सुरू आहे. येत्या काही वर्षांत देशाचा हा पट्टा बंागलादेशचा भाग बनवण्याचा संकल्प बंागलादेशातील कट्टरवाद्यांनी सोडला आहे व त्यामुळे आपल्या लोकांची लोकसंख्या या भागात वाढवण्याचे नियोजित कारस्थान सुरू आहे. कॉंग्रेसने केवळ मतांचे राजकारण करून या लोकांना आश्रय देण्यास सुरुवात केल्याने या कटात बंागलादेशींचे स्वप्न पूर्ण करण्यास कॉंग्रेसचाही हात असल्याचे तेथील नेते सर्रासपणे सांगतात. देशहिताखातर या कॉंग्रेसचा नायनाट करणे हे आता देशवासीयांसमोरील मोठे आव्हान असून येत्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने हा विडा उचलावा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सुमारे 80 टक्के हिंदू लोक राहणाऱ्या या देशात राम मंदिर किंवा अमरनाथ यात्रेकरूंना जागा मिळत नसेल तर ती कुठे पाकिस्तानात मिळेल, असा सवाल विजेजू यांनी उपस्थित केला. केवळ निधर्मी व जातीयतेचे टुणटुणे वाजवून कॉंग्रेस आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाचे नेतृत्व जोपर्यंत गांधी घराण्याच्या जोखडातून मुक्त होणार नाही तोपर्यंत हा देश सुधारणार नाही, असेही ते म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनीही यावेळी कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली. अर्थसंकल्पात सुमारे 60 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर झाली असली तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र अजूनही सुरू आहेत. हा पैसा खरोखरच शेतकऱ्यांकडे पोहोचणार की पुढील लोकसभेसाठी वापरण्याची तरतूद सरकारने केली आहे, याचा शोध लावावा लागेल,असा संशय श्री.नाईक यांनी व्यक्त केला. राहुल गांधी विदर्भात गेले व तिथे त्यांनी एका शेतकऱ्याची विधवा पत्नी कलावती हिची भेट घेतली. तिच्या घरात वीज नसल्याचे कारण पुढे करून अणूकराराचे समर्थन करण्याचा बाळबोधपणा राहुलने केला. आपल्या पणजोबापासून ते वडिलांपर्यंत देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी एवढी वर्षे काय दिवे लावले याचा शोध त्यांनी सुरुवातीला लावावा,असा सल्ला श्रीपाद नाईक यांनी दिला. विदर्भातील कलावतीप्रमाणे इथे प्रत्येक ठिकाणी पिडीत लोक आहेत व त्यांच्या नावाने फुकाची भाषणे व घोषणा करून कॉंग्रेस या लोकांच्या टाळूवरील लोणी चाखण्यातच गुल्ल आहे, असा थेट आरोप श्री.नाईक यांनी केला. अणूकराराला भाजपचा विरोध नसला तरी या कराराव्दारे देशाचा स्वाभिमानच गहाण ठेवण्याची कृती निषेधार्ह असल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले.इराककडे अण्वस्त्रे असल्याचे सांगून या देशात घुसून अमेरिकेने इराकची ज्या पद्धतीने राखरांगोळी केली तीच परिस्थिती भारतावर भविष्यात येऊ नये,अशी भिती त्यांनी व्यक्त केली.अणूकरारानंतर केवळ चार ते पाच टक्के वीज वृद्धी होणार असल्याने त्याचा बाऊ करून हजारो कोटींच्या व्यवहारांचा हा करार एक गुपित असल्याचा धोकाही त्यांनी दर्शवला. कर्नाटकातील बंगलोर व त्यानंतर गुजरात येथे झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर कॉंग्रेसच्या हातात देश किती असुरक्षित आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आपल्या सुरक्षेची मदार या सरकारवर न ठेवता आता प्रत्येक नागरिकाने देशाचा शिपाई व सरदार म्हणूनच काम करावे लागेल,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आजच्या या सभेत बॉम्बस्फोटांत मृत झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत विजय चोडणकर यांनी केले. प्रास्ताविक नरेंद्र सावईकर यांनी केले. यावेळी राजेंद्र आर्लेकर,आमदार फ्रान्सिस डिसोझा,लक्ष्मीकांत पार्सेकर आदींनी भाषणे केली. आमदार दामोदर नाईक यांनी सूत्रसंचालन केले. पैंगिणचे आमदार रमेश तवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धफोंड पैंगिण येथे श्री बलराम निवासी हायस्कूलच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गेल्याने विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हे या सभेस अनुपस्थित होते.

No comments: