Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 28 July, 2008

गोव्याच्या सुरक्षेबद्दल सरकारच बेफिकीर

'सिमी'च्या वावराकडे दुर्लक्ष नको : पर्रीकर
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): बंगलोर व अहमदाबाद येथे दहशतवाद्यांनी घडवून आणलेले बॉम्बस्फोट व गोव्यात "सिमी' या कट्टरवादी संघटनेच्या तथाकथित वावराबाबत मिळालेले ठोस पुरावे या पार्श्वभूमीवर गोव्याची सुरक्षितता धोक्यात असून विद्यमान दिगंबर कामत सरकार याबाबत बेफिकीर असल्याचा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज केला.
अमेरिका दौऱ्यावरून अलीकडेच परतलेल्या पर्रीकर यांनी राज्यातील अलीकडच्या काळात घडलेल्या अनेक प्रकरणावरून सरकारला चांगले वेठीस धरले. आज पक्षाच्या विधिमंडळ गटाची बैठक झाली व त्यात येत्या पावसाळी अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासंबंधी व्यूहरचना आखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ही बैठक पुढील शुक्रवारी पुन्हा घेतली जाणार असून त्यानंतरच अंतिम रणनीती ठरवली जाणार असल्याचे ते म्हणाले.
मुख्यत्वे कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून मुख्यमंत्री व गृहमंत्री या दोघांनाही चांगलेच धोरवर धरण्याचे ठरले आहे. राज्यात नागरिकांसह खुद्द देवही असुरक्षित बनल्याचा आरोप करून वाढती मूर्ती तोडफोड प्रकरणे ही जाणीवपूर्वक हिंदू व मुस्लिमांत दंगल पेटवण्यासाठी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात तलवारी सापडतात व त्यात त्यांच्या निकट वारणाऱ्यांचा जवळचा संबंध असल्याने मुख्यमंत्र्यांकडून त्यांना सांभाळण्याचे प्रयत्न केले जातात हे लाजिरवाणे असल्याची टीका पर्रीकरांनी केली.
मडगावात चोऱ्यांचा सुळसुळाट सुरू असून पोलिसांना कुणीही सापडत नाही हा काय प्रकार, असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. या चोरांचा शोध लावण्यात असमर्थ ठरणारे पोलिस दहशतवाद्यांचा मुकाबला कसा करणार, असा सवाल त्यांनी केला. पोलिस चौकशीत झालेल्या गचाळपणामुळे बाटलू व दिपेश रायकर यांच्यासारखे लोक सुटले. मडगावात दंगल झाली असता इस्पितळाच्या आवारात पेट्रोल बॉम्ब फेकण्याची हिंमत संबंधितांनी दाखवली. त्यामुळे गोव्यात यापुढे दहशतवादी हल्ले होणार नाहीत, असा समज करून घेणे चुकीचे ठरेल,असे पर्रीकर म्हणाले.
विविध राज्यांत "सिमी'च्या कार्यकर्त्यांना पकडले गेले असता त्यांनी आपल्या जबानीत "सिमी'चा डेरा गोव्याकडे वळवल्याचे संकेत दिले आहेत. २००० साली वास्को येथे चर्चमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातही "सिमी'वरच संशयाचे वलय असल्याने याप्रकरणी पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष गोवेकरांना महागात पडण्याची शक्यता असल्याची भीतीही पर्रीकर यांनी बोलून दाखवली. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या अहवाल फेटाळून गोव्यात "सिमी' नाहीच, असा घाईगडबडीत दावा मुख्यमंत्री कोणत्या आधारावर करतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गेल्या डिसेंबर महिन्यात गोव्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे मनसुबे पक्के होते हे सदर दहशतवाद्याला पकडल्यानंतर उघड होऊनही सरकार कोणतीही दक्षता घेत नाही. राज्यातील काही झोपडपट्या व मडगावातील मोती डोंगर तसेच खारेबांध येथे कट्टरपंथीय लोक आसरा घेण्याची शक्यचा वर्तवून अशा ठिकाणांची एव्हानाच झडती झाली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री जर अशा लोकांना आश्रय देत असतील तर ते गोमंतकीयांच्या सुरक्षिततेशी खेळ करीत असल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला.

No comments: