Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 August, 2008

राज्यात बेकायदा खाण उद्योगाचा सुळकर्ण प्रकरणाशी संबंध शक्य खास चौकशीची पर्रीकरांकडून मागणी

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): गोव्यात बेकायदा खाण उद्योग झपाट्याने पसरत असून ही स्थिती कायम राहिल्यास यापुढे स्थानिक लोक हिंसेचा मार्ग पत्करतील, अशी भीती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली.
केपे तालुक्यातील सुळकर्णे येथे काही लोकांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात बेकायदा खाण उद्योगाचा संबंध असावा, अशी शक्यता आहे. त्यामुळे या मृत्युप्रकरणाची खास न्यायाधीश किंवा केंद्रीय अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे केल्याचे पर्रीकर म्हणाले. आज पणजीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सुळकर्णे येथे एका इसमाचा मृत्यू झाला असता त्याला हृदयविकाराचा झटका आला. लगेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुळात हा इसम बेकायदा खाणीत अपघात झाल्याने मृत्यू पावल्याची तेथील लोकांची शंका आहे. त्याला लगेच बाहेर काढून साफ करून त्याचे अंत्यसंस्कार करण्याचा प्रकार हा स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न आहे. त्याची कसून चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.
या घटनेनंतर लगेच रिवण येथे एका बारमध्ये दोघा कामगारांचा झालेला गूढ मृत्यू व काकोडा येथे मिळालेले बेवारस मृतदेह आदी घटनांची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. या बेकायदा खाण उद्योगाबाबत माहिती असलेल्या व त्यांच्याकडून गौप्यस्फोट केला जाणार या भीतीने घातपात घडवला जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पर्रीकर म्हणाले.
राज्यात एकीकडे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना आपण जर काही घटनांबाबत बोललो तर पर्रीकरांनी पोलिसांना त्याबाबतची माहिती द्यावी असे गृहमंत्री रवी नाईक म्हणतात. गृहमंत्र्यांची ही भाषा आपल्या पोलिस खात्याची अकार्यक्षमताच चव्हाट्यावर मांडते. पोलिसांनी सर्व गोष्टींचा विचार करूनच चौकशी केली तर दोषींना पकडणे कठीण नाही, असेही ते म्हणाले. पोलिस प्रामाणिकपणे चौकशी करतील व त्यांनी या व्यतिरिक्त काही माहितीसाठी आपला सल्ला मागितला तर आपण त्यांना अवश्य मदत करू, असे पर्रीकर म्हणाले.

No comments: