Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 15 June, 2008

आयआयटीत गोव्याची गरुडझेप! अंतिम परीक्षेसाठी १२ विद्यार्थी पात्र

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) अंतिम पात्रता परीक्षेत यावर्षी राज्यातील विद्यार्थ्यांनी गरुडझेप घेतली आहे. गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यातील बारा विद्यार्थी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची परीक्षा देण्यास पात्र ठरले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांना आज (दि. १४) मिरामार रेसिडेन्सी येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. दिलीप देवबागकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
रौनक साखरदांडे, गणपती भट, आर. श्रीनिवास, पल्लवी खरे, संपत देसाई, राहुल प्रभू, रोहित धुमे, रॉबर्ट बोरकर, यशांक साखरदांडे, केवल रामाणी, अकिलेश खोपे, अरुण मल्याळ या विद्यार्थ्यांनी आयआयटी परीक्षेत चांगले यश संपादन करून स्वतःबरोबरच गोव्याचे नावही उज्ज्वल केले आहे. गेल्या वर्षी या परीक्षेसाठी गोव्यातून चौघे विद्यार्थी पात्र ठरले होते. त्या तुलनेत यंदा गोव्याने धवल यश मिळवले आहे.
व्यासपीठावर प्रा. देवबागकर, व्ही. ए. पै पाणंदीकर, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सतीश शेट्ये, कमलेश पै पाणंदीकर, उच्च शिक्षण खात्याचे संचालक भास्कर नायक आणि "आर्यन क्लासेस'चे मुख्य शिक्षक व्यंकटेश प्रभुदेसाई उपस्थित होते.
आयआयटीसारख्या कठीण परीक्षेत यावर्षी राज्यातील विद्यार्थ्यांनी घेतलेली भरारी अभिनंदनीय आहे. आजची युवा पिढीच देशाचे भवितव्य घडवणार आहे. या युवकांचे भवितव्य उज्ज्वल आहे. युवकांनी प्रगतीचा हा वेग कायम राखल्यास भारत अमेरिकेलाही मागे टाकू शकतो. त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस आपल्या खास शुभेच्छा, असे प्रा. देवबागकर यांनी सांगितले.
कमलेश पै पाणंदीकर यांनी विद्यमान युगात शक्तीपेक्षा बुद्धीनेच आपण जगात आपली ओळख निर्माण करू शकतो यावर भर दिला. विद्यार्थ्यांना गौरविल्यानंतर सतीश शेट्ये यांच्या हस्ते दिलीप देवबागकर, कमलेश पाणंदीकर, व्ही. ए. पाणंदीकर आणि प्रा. व्यंकटेश प्रभुदेसाई यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
व्यासपीठावरील मान्यवर आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सतीश शेट्ये यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दिनार भाटकर यांनी केले.

No comments: