Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 19 June, 2008

पाठिंबा काढण्याची डाव्यांची पुन्हा धमकी

नवी दिल्ली, दि.१९ : भारत आणि अमेरिका यांच्यातील नागरी अणुऊर्जा सहकार्य करारावर डाव्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलेली आहे. "अणुकराराच्या मुद्यावर केंद्र सरकारने पुढील पाऊल जर उचलले तर डावे पक्ष पाठिंबा काढून घेतील. अणुकराराला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. डावे पक्ष कोणत्याही परिस्थितीत अणुकरार पूर्ण होऊ देणार नाही,''असा रोखठोक इशारा माकपा नेते व पॉलिटब्युरो सदस्य सीताराम येचुरी यांनी आज दिला.
""अणुकरारावर डावी आघाडी आणि संपुआ यांच्यातील समन्वय समितीची बैठक २५ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. २५ जूनपर्यंत संपुआकडे विचार करण्यासाठी वेळ आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. अणुकरारावर त्यांनी पुढे पाऊल टाकल्यास पाठिंबा काढण्याशिवाय पर्याय राहणार नाही,''असे येचुरी म्हणाले.
अणुकरार कार्यान्वित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे कॉंग्रेसने बुधवारी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर येचुरी यांनी हा इशारा दिलेला आहे. केंद्रातील संपुआ सरकारला डाव्या आघाडीचा बाहेरून पाठिंबा आहे. लोकसभेतील डाव्यांच्या ६० सदस्यांच्या पाठिंब्यामुळेच संपुआ सरकार तगलेले आहे. डाव्यांनी पाठिंबा काढल्यास सरकार गडगडेल.
अणुकराराच्या मुद्यावर सरकारला आयएईएकडे जाण्यापासूनही रोखलेले आहे. आयएईएकडे सरकार गेल्यास पाठिंबा काढू, असेही डाव्यांनी यापूर्वीच बजावलेले आहे.
या मुद्यावर कॉंग्रेस आणि डाव्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे समन्वय समितीच्या पुढील बैठकीत अणुकरारावर सरकार एकतर्फी पाऊल टाकण्याचा निर्णय घेऊ शकते, असे मानले जात आहे.
सीरियाचे राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर आले असल्याने परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी हे व्यस्त असल्याचे सांगून समन्वय समितीची बैठक लांबणीवर टाकण्यात आली होती.

No comments: