Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 19 June, 2008

'दार्जिलिंग बंद'मुळे रोज ७ कोटींचा फटका

गंगटोक, दि.१९ : वेगळ्या गोरखालॅंड राज्याच्या मागणीसाठी "गोरखा जनमुक्ती मोर्चा'ने पुकारलेल्या बेमुदत "दार्जिलिंग बंद'मुळे मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. या बंदमुळे दररोज ७ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३१ ए वरील वाहतूक सोमवारी सायंकाळपासून ठप्प केली असल्याने सर्वात मोठा फटका बसत आहे. दार्जिलिंग मार्गे सिक्कीम आणि सिलिगुडी दरम्यानची वाहतूक ठप्प झाली असल्याने प्रचंड नुकसान होत आहे.
दार्जिलिंग जनमुक्ती मोर्चाने गेल्या २२ फेब्रुवारीपासून पुकारलेल्या तीन दिवसीय बंदचा कोणता प्रभाव झाला, याविषयीचा आढावा राज्याच्या अर्थ, सांख्यिकी विभागाने घेतला. त्यांच्या या पाहणीत दररोज ५.९५ कोटी रुपयांचा फटका बसत असल्याचे आढळून आले. फेब्रुवारीमध्येच जर दिवसाकाठी ५.९५ कोटी रुपयांचा फटका बसलेला आहे तर आजच्या घडीला महागाई खूप वाढलेली आहे. त्यात भर म्हणजे पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ झालेली आहे. त्यामुळे सद्यस्थितीतील बंद दरम्यान दररोजचा फटका जवळपास ७ कोटी रुपयांवर नक्कीच आहे. सात कोटी दररोज याप्रमाणे गेल्या तीन दिवसातील बंदचा फटका २१ कोटी रुपयांवर पोहोचलेला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

No comments: