Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 17 June, 2008

चौपदरीकरण अखेर केंद्रामार्फतच

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): पत्रादेवी ते पोळे या राष्ट्रीय महामार्ग १७ चे चौपदरीकरण अखेर केंद्र सरकारच्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे. त्याबाबतची सर्व पूर्वतयारी झाली असून एप्रिल २००९ पासून हे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सचिवांनी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना दिले आहे.
लोकसभा याचिका समितीची बैठक गेल्या ९ जून रोजी प्रभूनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे झाली. या बैठकीत खास करून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या चौपदरीकरणाचा मुद्दा सार्दिन यांनी लावून धरला. गोव्यात राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक व रस्ते अपघात यांचा उल्लेख हे काम प्राधान्यक्रमाने हाती घेण्याची मागणी केली.
यावेळी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. या प्रकल्पाबाबतचा "ड्राफ्ट फ्रेश रिपोर्ट' खात्याला सुपूर्द करण्यात आल्याची माहिती खात्याच्या सचिवांनी दिली. अंतिम अहवाल येत्या जुलै २००८ मध्ये खात्याकडे सुपूर्द केला जाणार असून येत्या सप्टेंबर महिन्यात "बूट' (बांधा, वापरा, सोपवा) पद्धतीवर हा प्रकल्प राबवण्यासाठी इच्छुक कंपनीकडून प्रस्ताव मागवले जाणार आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली आहे. दरम्यान, सार्दिन यांनी केंद्र सरकारकडून मिळवलेल्या या आश्वासनामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी हा प्रकल्प राज्य सरकारतर्फे राबवण्याबाबत केंद्राला पाठवलेला प्रस्ताव फेटाळला गेल्यातच जमा आहे. हा प्रकल्प राबवण्यासाठी विविध कंपन्या पुढे आल्याची माहितीही सरकारी सूत्रांनी दिली.

No comments: