Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 17 June, 2008

आता "माऊस' देणार शिक्षणाचे धडे...

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): 'पाटी पेन्सिल फेकून द्या, की बोर्ड व माऊसचा ताबा घ्या,'हाच नवयुगातील शैक्षणिक संदेश असेल. राज्यातील प्रत्येक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात यापुढे विद्यार्थी प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकांवर अवलंबून न राहता संगणकाच्या साहाय्याने विषय शिकणार आहेत. प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान व सविस्तर माहिती पुरवण्यासाठी यापुढे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संगणकाद्वारे शिक्षण देण्याची अनोखी योजना तयार करण्याचे काम सध्या शिक्षण खात्यातर्फे सुरू आहे.
शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करून ते जास्त स्पर्धात्मक व गुणात्मक करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे बदल करण्याचा विचार सरकारने चालवला आहे. सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांना लवकर व जास्त सहजतेने विषयाचे आकलन होण्यासाठी संगणकाचा वापर प्रत्यक्ष शिकवताना करावा, असा विचार पुढे आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांनी संगणक साहाय्य शिक्षण देण्याबाबत विचार करणार असल्याचे आश्वासन दिले असता सध्या यासंबंधी योजना तयार करण्याचे काम शिक्षण खात्यातर्फे सुरू असल्याच्या वृत्ताला शिक्षण खात्याच्या नियोजन विभागाचे उपसंचालक अनिल पवार यांनी दुजोरा दिला. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातही शिक्षण व आरोग्याला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे त्याचाही लाभ उठवून शिक्षणाच्या बाबतीत गोवा हे आदर्श राज्य बनवण्याचा संकल्प मुख्यमंत्री कामत यांनी सोडल्याची माहिती देण्यात आली. यापूर्वी "जैपी'कंपनीतर्फे असाच एक प्रस्ताव सरकारकडे दाखल झाला होता. या कंपनीतर्फे पाचवी ते दहावीपर्यंतच्या प्रत्येक विषयाची खास "सीडी' तयार करण्यात आली होती. या सीडीच्या माध्यमाने प्रत्येक विषय हलती चित्रे व माहितीच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना शिकवता येणे शक्य होते. या प्रस्तावाअंतर्गत सदर कंपनीतर्फे प्रत्येक वर्गांत एक टीव्ही व प्रोजेक्टर बसवण्याचा प्रस्ताव होता, परंतु हा प्रस्ताव त्यावेळी फेटाळण्यात आला होता. आता प्रत्यक्षात या योजनेची आखणी सुरू आहे.या संपूर्ण प्रक्रियेला आणखी एक वर्ष लागण्याची शक्यता असल्याची माहिती पवार यांनी दिली. या योजनेसाठी सरकारला मोठा खर्च येणार आहे. या योजनेच्या कार्यवाहीसाठी राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पायाभूत सुविधा निर्माण करावी लागणार आहे. हा संपूर्ण प्रकल्पच एक अभिनव प्रकल्प ठरणार आहे.

No comments: