Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 18 June, 2008

गुज्जर, बंजारा, रेवाडींना ५ टक्के आरक्षण, तीनही जातींना विशेष वर्गाचा दर्जा, गुज्जर आंदोलन समाप्त

जयपूर, दि.१८ : गुज्जर आंदोलक व राजस्थान सरकार यांच्यात मंगळवारी झालेल्या कराराची औपचारिक घोषणा अपेक्षेनुसार आज करण्यात आली. उभय बाजूंमध्ये झालेल्या या करारानुसार, राजस्थानमध्ये गुज्जर, बंजारा व रेवाडी या तीन जातींना विशेष वर्गाचा दर्जा देण्यात आला असून त्यांच्याकरिता पाच टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांनाही १४ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. करारातील या तरतुदींची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आज केली. या घोषणेच्या वेळी गुज्जर नेते किरोडीसिंग बैंसला हे देखील उपस्थित होते. आरक्षणावर यशस्वी वाटाघाटी झाल्याने गुज्जरांनी गेल्या २६ दिवसांपासून पुकारलेले आंदोलन समाप्त झाले आहे.
""गुज्जरांशिवाय बंजारा व रेवाडी समाजालाही विशेष वर्गात स्थान देण्यात आलेले आहे. या तीनही समाजांसाठी पाच टक्के आरक्षण ठेवण्याची तरतूद केलेली आहे. आरक्षणाच्या या नव्या तरतुदींमुळे राज्यातील सद्यस्थितीत असलेल्या आरक्षण व्यवस्थेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही. याशिवाय ब्राह्मण, कायस्थ आणि वैश्य यासारख्या खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांनाही १४ टक्के आरक्षणाची तरतूद ठेवण्यात आलेली आहे. या तरतुदीमुळे त्यांना देखील विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडता येईल,''अशी घोषणा मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आज केली.
मुंडे व जावडेकरांचे आभार
""गुज्जरांच्या आंदोलनाचा व त्यांच्या मागण्यांचा चिघळलेला हा प्रश्न हाताळण्यासाठी व सोडविण्यासाठी भाजपा नेते गोपीनाथ मुंडे व पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याबद्दल दोन्ही नेत्यांचे जाहीर आभार मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी मानले.
बैंसला व राजेंनी मागितली माफी
गुज्जरांनी पुकारलेल्या २६ दिवसांच्या आंदोलनामुळे सामान्य जनतेला झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्री राजे व गुज्जर नेते किरोडीसिंग बैंसला यांनी माफी मागितली आहे. ""आंदोलनामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द झाल्या. अनेक रेल्वेगाड्यांचे मार्ग वळविण्यात आले. रस्त्यावरील वाहतूकही रोखली गेल्याने सर्वसामान्यांना खूप त्रास सोसावा लागला. याबद्दल मी जनतेची माफी मागतो,''असे बैंसला यांनी सांगितले.

No comments: