Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 20 June, 2008

महागाईने १३ वर्षांतील सर्व विक्रम मोडले

दर ११.०५ टक्के
.. संपुआने केला आम आदमीचा सत्यानाश
.. महागाई रोखण्याचे ढोंग उघडकीस
.. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचे परिणाम
.. अन्नधान्य, खाद्यतेल सामान्यांच्या आवाक्याबाहेर

नवी दिल्ली, दि.२० : केंद्रातील कॉंगे्रसप्रणित संपुआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे बेलगाम झालेल्या महागाईने मागील १३ वर्षांतील नवा उच्चांक गाठताना ११.०५ टक्के हा आकडा गाठला आहे सर्व विक्रम मोडित काढले आहेत. "आम आदमी'च्या हितापेक्षा आमच्यासाठी काहीच महत्त्वाचे नाही, अशा पोकळ गप्पा करणाऱ्या संपुआ सरकारने आज या "आम आदमी'लाच "घाम' फोडला आहे. अन्नधान्य, खाद्यतेल यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या असताना आणि महागाईच्या आगीत संपूर्ण देश होरपळत असताना अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी "ऐसा तो होना ही था' असे निर्लज्ज विधान करून कॉंगे्रसला "आम आदमी' विषयी कुठलीही दयामाया नसल्याचे स्पष्ट केले. तर, आपल्या सरकारचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना संपुआच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महागाईचे खापर राज्य सरकारांच्या माथ्यावर फोडले. दुसरीकडे, अणुकराराच्या मुद्यावरून पाठिंबा काढण्याची धमकी देणारे डावे पक्ष महागाईसाठी संपुआ सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करून मोकळे झाले.
५ जून रोजी संपुआ सरकारने पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींमध्ये मोठी वाढ केली होती. या दरवाढीमुळे महागाई दुहेरी आकडा गाठेल, असे भाकित विविध अर्थतज्ज्ञांनी आधीच वर्तविले होते. पण, स्वत: पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीपेट्रोलियम दरवाढीच्या निर्णयानंतर दूरदर्शनवरून राष्ट्राला संबोधित करताना, ""यापुढे महागाईचे चटके सर्वसामान्यांना फार जास्त बसणार नाही तसेच, अन्नधान्याच्या किमतीत एक पैशानेही वाढ होणार नाही,'' अशी ग्वाही दिली होती. त्यांची ही ग्वाही देखील आज फोल ठरली.
२९ मे रोजी संपलेल्या आठवड्यात महागाईने चार वर्षांतील उच्चांक गाठताना ७.७५ हा आकडा पार केला होता. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे हा दर फार तर दुहेरी आकडा गाठत १० च्या घरात जाईल असा अंदाज होता. पण, सारे अंदाज चुकवित महागाईने ११.०५ असा विक्रमी आकडा गाठून, संपुआ सरकारचा खोटारडेपणाच आम आदमीपुढे उघड केला आहे. यापूर्वी ६ मे १९९५ रोजी महागाईचा दर ११.११ टक्के इतका होता.
अल्पमुदतीचे कर्ज महागणार
महागाईने आधीच सर्वसामान्यांना सळो की पळो करून सोडले असताना भारतीय रिझर्व्ह बॅंक महागाई नियंत्रित करण्यासाठी आपले आर्थिक धोरण आणखी कडक करणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. "रेपो' दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात येणार असून, या महिन्यातील ही सलग तिसरी वाढ ठरणार आहे. यामुळे अन्य राष्ट्रीय आणि सहकारी बॅंकांनाही व्याज दरात वाढ करणे भाग पडणार असून, सर्वसामान्यांसाठी अल्पमुदतीचे कर्जही महाग होणार आहे.
रिझर्व्ह बॅंकेने आतापर्यंत "रेपो' दरात ०.२५ टक्क्यांनीच वाढ केली आहे. आता मात्र, ही वाढ ०.५० टक्के इतकी असणार असल्याचे क्रिसिलचे मुख्य अर्थतज्ज्ञ डी. के. जोशी यांनी सांगितले.
अन्नधान्य, खाद्यतेल, फळे, भाजीपाला कडाडला
देशभरातच महागाईचे चटके सर्वसामान्यांना असाह्य झाले आहेत. अन्नधान्य, खाद्यतेल, फळे, भाजीपाला यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींनीही आजवरचे सर्वच उच्चांक मोडित काढले आहेत. २९ मे ते ४ जून या एका आठवड्यात खाद्य तेलाच्या किमती १० टक्क्यांनी वाढल्या असून, गहू, तांदळाच्या किमतीतही सुमारे ३ ते ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

No comments: