Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 15 June, 2008

बुधवारपासून कामावर बहिष्कार

बोलणी निष्फळ ठरल्याने कर्मचारी आक्रमक
पणजी, दि. 15 (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि मुख्य सचिव जे.पी.सिंग यांच्याशी झालेली आजचीही चर्चा विफल ठरल्याने सोमवार व मंगळवार पर्यंत 'पेन डाऊन' तर बुधवारपासून कामकाजावर बहिष्कार टाकून संपूर्ण सरकारी यंत्रणा ठप्प करण्याचा इशारा सरकारी कर्मचारी संघटनेने दिला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे केवळ दोन दिवसांचा अवधी आहे. सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली असून येत्या दोन दिवसांत हा गुंता सोडवला नाही तर हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना घेऊन पणजीत आमरण उपोषण करण्यांचीही तयारी असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष अरुण तळावलीकर यांनी यावेळी सांगितले.
आज सकाळी मुख्यमंत्री कामत यांच्या मडगाव येथील निवासस्थानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत समान वेतन श्रेणी लागू केल्यास केवळ 15 कोटींचा आर्थिक बोजा येणार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दुपारी मुख्य सचिव सिंग यांचे भेट घेण्यात आली. परंतु यावेळी सर्व बोलणी फिसकटल्याने सरकारला केवळ दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती श्री. तळावलीकर यांनी दिली.
हा गुंता अधिक वाढण्यास वित्त खात्याचे अवर सचिव श्री. शानभाग जबाबदार असून त्याने सरकारची दिशाभूल केल्याचा आरोप यावेळी संघटनेचे सचिव गणेश चोडणकर यांनी केला. थकबाकी सोडण्यासही आम्ही तयार आहोत. परंतु मूळ वेतन वाढीव प्रमाणे कायम ठेवून वेतन वाढ द्यावी, यावर आम्ही ठाम असल्याचे श्री. तळावलीकर यांनी सांगितले.
उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वरून 58 करण्याचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. परंतु निवृत्तीवय 58 वरून 60 करण्याचा सरकारचाच निर्णय होता, त्याची आम्ही मागणी केली नव्हती, असे श्री. तळावलीकर म्हणाले. 58 वर्षे निवृत्ती वय हा नियम सर्वांनाच लागू करावा लागणार आहे. तसेच निवृत्तीवय 58 केल्यास सरकारी तिजोरीवर 450 कोटी रुपयांच्या आर्थिक बोजा पडणार आहे. कर्मचाऱ्यांनी कर्ज घेतलेले असून त्यांचे हप्ते भरण्यास त्यांना कठीण जाणार असल्याचेही श्री. तळावलीकर यावेळी म्हणाले.

No comments: