Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 18 June, 2008

आमच्या मुलांना नोकऱ्या कधी?

क्रांतिदिनी स्वातंत्र्यसैनिकांनी काढले सरकारचे वाभाडे
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. त्यांना नोकऱ्या न दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषणाला बसू, असा इशारा देत आज स्वातंत्र्यसैनिकांनी क्रांतिदिनीच सरकारचे भर मंचावरून वाभाडे काढले. मुख्यमंत्र्यांनी ५०० तरुणांना, तर आरोग्यमंत्र्यांनी ४०० तरुणांना नोकऱ्या दिल्या अशी जाहिरातबाजी चालवली आहे. मात्र यात किती स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या, असा खडा सवाल यावेळी दमण व दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ चोडणकर यांनी केला.
मनोहर पर्रीकर सरकारने निदान या तरुणांना नोकऱ्या देण्याचा योजना आखल्या होत्या. त्यासुद्धा सध्याच्या सरकारला पुढे चालवता आल्या नाहीत, अशी खरमरीत टीका स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत केंकरे यांनी केली. राज्याचा ६३ वा " क्रांतिदिन' आज येथील 'आझाद मैदान'वर साजरा पाळण्यात आला. याप्रसंगी राज्यपाल एस. सी. जमीर व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते ४१ स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात आला.
स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या नोकऱ्या देण्याच्या मुद्यावरून दोन्ही स्वातंत्र्यसैनिक संघटनांच्या अध्यक्षांनी आज सरकारची खरडपट्टी काढली. श्री. चोडणकर यांनी मंचावर येताच कामत सरकारचा निषेध केला, त्यामुळे सर्वच अवाक झाले. यावेळी वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांना आपले हसू आवरता येत नव्हते. छायाचित्रकारांनी तोही क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला.
राजकीय व्यक्ती न विसरता स्वतःच्या मुलांना चांगल्या हुद्यावर नोकरीला लावतात. मग आमच्याच मुलांना नोकरीपासून का वंचित ठेवले जाते, असा सवाल चोडणकर यांनी केला. "भांगराळे गोय' म्हणून अनेकांनी आजपर्यंत फक्त पैसेच कमवले. अन्यथा गोवा हे आदर्श राज्य झाले असते, अशी खंत श्री. केंकरे यांनी व्यक्त केली. "तुमच्यामुळे गोवा मुक्त झाला, अशी स्तुतिसुमने
मंत्रिलोक भाषणे ठोकतात. मात्र, शब्दांनी आणि स्तुतीने पोट भरत नाही, असे ते पुढे म्हणाले. बेकायदा कॅसिनो व खाणी बंद करून दाखवा, असे आव्हान यावेळी श्री. केंकरे यांनी सरकारला दिले.
सरकारी कोट्यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना मुलांना आरक्षण आहे. त्यामुळे हा विषय आमनेसामने बसून सोडवता येईल, असे मत यावेळी मुख्यमंत्री कामत यांनी व्यक्त केले. यावेळी राज्यपाल एस. सी. जमीर यांनी आपल्या भाषणात गोमंतकीयांना क्रांतिदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, येत्या स्वातंत्र्यदिनी पत्रादेवी येथे शालेय विद्यार्थ्यांना बसण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध केली नाही तर तेथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या मंचावर आपण चढू, असा इशारा केंकरे यांनी दिला. तसेच कोसळणाऱ्या दरडींवर करोडो रुपये खर्च करण्यात आले. आता गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या समोर दीड कोटी रुपये खर्च करून कमान उभारली जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च न करता आपण हे काम करून दाखवतो, आपणही कंत्राटदार आहोत, असे केंकरे यावेळी म्हणाले.

No comments: