पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): सीरियल किलर महानंद नाईक आज आणखी एका खून प्रकरणातून पुराव्याअभावी दोषमुक्त झाला. याविषयीचा आदेश जिल्हा सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी दिला. आत्तापर्यंत १६ पैकी ३ प्रकरणात महानंद नाईक हा दोषमुक्त झाला आहे तर, बलात्कार प्रकरणात त्याला सात वर्षाची कैद झालेली आहे.
३५ वर्षीय शकुंतला कवठणकर या तरुणीचा खून केल्याचा आरोप महानंद याच्यावर होता. २००५ साली शकुंतला हिचा खून झाला होता. मात्र, महानंद हाच या खुनामागे असल्याचे पुरावे फोंडा पोलिस न्यायालयात सादर करू न शकल्याने आज त्याला दोषमुक्त करण्यात आले. शकुंतला हिचा खून कुंकळ्ळी पठारावर करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मयत शकुंतला ही मये डिचोली येथे राहत होती, ती "सेल्स गर्ल' म्हणून नोकरी करीत होती. महानंद याने तिच्याशी मैत्री करून कुंकळ्ळी येथील डोंगरावर तिचा ३० डिसेंबर २००५ रोजी गळा आवळून खून केला असल्याचे पोलिसांनी महानंदच्या विरोधात सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटले होते.
दरम्यान, १६ पैकी ४ खून प्रकरणात महानंद नाईक हा दोषमुक्त झाल्याने पोलिसांनी केलेल्या तपासकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक सी. एल. पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड केला होता. तसेच, एका बलात्कार प्रकरणावरून सीरियल किलर महानंद नाईक याला उघडकीस आणले होते. परंतु, एका मागून एक अशा चार खटल्यात महानंद नाईक याची पुराव्याअभावी सुटका होत असल्याने नेमके हे खून कोणी केले होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Tuesday 26 October, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment