Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 29 October, 2010

पुन्हा "सागर कवच'मुळे खोळंबा!

पणजी व मडगाव, दि. २८ (प्रतिनिधी)- गोव्याचा किनारी भाग किती सुरक्षित आहे, याचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी सहा वाजल्यापासून "सागर कवच' मोहिमेअंतर्गत संपूर्ण राज्यात नाकाबंदी करण्यात आली होती. समुद्रमार्गे राज्यात दहशतवादी घुसले असून त्यांचा शोध घेण्याचे आदेश सर्व पोलिस स्थानकाच्या पोलिसांना देण्यात आला. यासाठी रस्ते तसेच रेल्वे स्थानकांवर नाकाबंदी करण्यात आली होती. यामुळे सकाळपासूनच राज्यातील प्रमुख शहरात वाहनांची कोंडी झाली होती, याचा सरकारी कार्यालयात जाणारे कर्मचारी तसेच परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसला. नौदल, तटरक्षक आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही मोहीम हाती घेतली होती.
""मुंबईवर हल्ला करण्यासाठी हल्लेखोर समुद्रमार्गे घुसल्याने आता राज्यातील किनारे किती सुरक्षित आहेत, हे पाहण्यासाठी अशा प्रकारचे "मॉक ड्रिल' वेळोवेळी केले जात आहे. हा त्याचाच एक भाग असून उद्याही असाच सराव केला जाणार आहे,''असे पोलिस खात्याचे प्रवक्ते तथा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी सांगितले. समुद्राच्या आंतरराष्ट्रीय सीमांवर नौदल, समुद्राच्या किनाऱ्यावर तटरक्षक दल आणि मरीन पोलिस तर, भूभागावर पोलिस या "मॉक ड्रिल'अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेत होते. गेल्यावेळी घेतलेल्या "मॉक ड्रिल'वेळी ज्या चुका झाल्या होत्या त्या यावेळी भरून काढण्याचा सर्वांनी प्रयत्न केला असल्याचेही प्रवक्ता देशपांडे यांनी सांगितले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा मुंबई भेटीवर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा आढावा घेतला जात आहे का? असा प्रश्न केला असता, ""त्याच्या सुरक्षेचा आणि या "मॉक ड्रिल'चा कोणताही संबंध नाही. गेल्या एका वर्षात अशा प्रकारचे तीन "मॉक ड्रिल' घेण्यात आले आहेत,'' असे ते म्हणाले.
आज सकाळी ६ वाजता पोलिस नियंत्रण कक्षातून सर्व पोलिस स्थानकांना दहशतवादी घुसल्याचा संदेश देण्यात आला. यात पणजीत चार दहशतवादी घुसल्याचे पणजी पोलिसांना सांगण्यात आले. त्याबरोबर या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे सत्र सुरू झाले. सकाळी ८ वाजता "डमि' म्हणून पाठवण्यात आलेल्या दहशतवाद्यांना हॉटेल "सिदाद द गोवा'च्या आवारात ताब्यात घेण्यात यश आले. तर, दुपारी २.३० वाजता "आयनॉक्स' सिनेमागृहाच्या सुरक्षा रक्षकांनी दोन "डमि' दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन याची माहिती पोलिसांना दिली.
दोन ते तीन तासांनी अशा प्रकारचे दहशतवादी घुसल्याची संदेश देऊन त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले जात होते. त्यावेळी पणजी स्थानकातील पोलिस गाड्या घेऊन भरधाव वेगाने पळत असताना पाहायला मिळत होते. तसेच, शहरावर अशा प्रकारचे संकट आल्यास पोलिस स्थानकावर कोणती काळजी घेतली पाहिजे, याचाही विचार यावेळी करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस स्थानकाच्या बाहेर दोन टेबले टाकून विशेष कक्ष स्थापन करण्यात आला होता.
दरम्यान, दहशतवादी हल्ल्याचा प्रतिकार कसा करावा व लोकांनी सतर्क कसे राहावे, याबाबत केंद्र सरकारच्या आदेशानुसार "सागर कवच'चे प्रात्यक्षिक आज सकाळपासून कोकण रेल्वेच्या मडगाव स्टेशनवर पार पडले. सर्वत्र सशस्त्र पोलिस बंदोबस्त, श्वानपथक, गुपचूप चाललेले तपासकाम व स्टेशनवर जाणारी सर्व फाटके बंद केल्याने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. रेल्वे स्टेशनवरील पोलिसांनाही सागर कवच प्रात्यक्षिकाची जाणीव दिली गेली नाही. कोणत्या तरी एका पार्सलमध्ये दोन बॉंब ठेवल्याची सूचना आल्याचे सांगून सुरू केलेले हे प्रात्यक्षिक शेवटी दुपारी २ वा. या संपले व लोकांनी तसेच प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
तत्पूर्वी, सकाळपासून प्रवाशांचे सामान, खिसे, स्थानकावरील सर्व दुकाने यांची तपासणी करण्यात आली. स्टेशनवर दाखल झालेल्या रेल्वे गाड्यांची व प्रवाशांची कसून तपासणी करण्यात आली. श्वानपथकाच्या साह्याने सुरू असलेली कारवाई पाहून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी या प्रात्यक्षिकासाठी डॉक्टर, परिचारिका व औषधासहित रुग्णवाहिका, अग्निशामक दल व सर्व अत्याधुनिक यंत्रणेची व्यवस्था केलेली होती. यामुळे काही तरी घडले असावे असेच सर्वसामान्यांना वाटत होते, त्याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत होता.

No comments: