Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 29 October, 2010

"महसूलमंत्र्यांची ती कृती यंत्रणेवरील अविश्वासच'

पणजी, दि.२८(प्रतिनिधी)- सरकारात मंत्री असलेले जुझे फिलिप डिसोझा यांनी आपल्या समर्थकांकरवी ज्या पद्धतीने आपले सहकारी तथा माजीमंत्री मिकी पाशेको यांना धक्काबुक्की केली व हॉटेलातील सामानाची नासधूस केली यावरून त्यांना आपल्याच सरकारी यंत्रणेवर विश्वास नाही हे उघड होत आहे. मिकी पाशेको मतदारांना पैशांचे आमिष दाखवण्यासाठी तिथे आले होते याची खात्री जुझे फिलिप यांना होती तर त्यांनी पोलिस किंवा निवडणूक आयुक्तांकडे तक्रार का केली नाही? असा सवाल मनोहर पर्रीकर यांनी केला.
महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा व मिकी पाशेको यांच्यात झालेल्या झटापटीच्या घटनेबाबत बोलताना श्री. पर्रीकर यांनी हे विधान केले. महसूलमंत्रीच जेव्हा कायदा हातात घेतात तेव्हा सामान्य लोकांची छळवणूक करण्याचा पोलिसांना अधिकार तो कोणता पोहोचतो? पोलिसांकडून या घटनेबाबत कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया का येत नाही? असे प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केले. सरकारी मंत्र्याने घटनेच्या मर्यादेत राहून वागण्याची गरज असते; परंतु जुझे फिलिप डिसोझा यांच्या कृतीवरून त्यांनी या सर्व मर्यादांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होत असल्याने अशा मंत्र्याला मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळात ठेवणार काय? याचा जबाब मुख्यमंत्र्यांनी द्यावा,असे ते म्हणाले.
राज्यपालांनी या घटनेची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती बनली आहे त्याचे हे ज्वलंत उदाहरण ठरत असल्याने घटनेच्या ३५६ कलमाखाली कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार राज्यपालांना आहेत, असे श्री. पर्रीकर यावेळी म्हणाले.

स्वच्छ व क्रियाशील उमेदवारांनाच निवडा
येत्या ३१ रोजी होणाऱ्या पालिका निवडणुकीत मतदारांनी स्वच्छ व क्रियाशील उमेदवारांनाच निवडून आणावे,असे आवाहन श्री. पर्रीकर यांनी केले. विविध पालिकांतील महत्त्वाचे विषय अजूनही सोडवले गेले नाहीत. कचरा विल्हेवाट प्रश्न तथा विविध पालिकांतील अत्यावश्यक पायाभूत सुविधांचा अभाव या गोष्टींचा प्रामुख्याने विचार झाला पाहिजे. हे विषय सोडवण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच निवडून आणून पैसा व इतर आमिषे दाखवून मतदारांना भुलविणाऱ्यांना घरी बसवण्याचे आवाहन त्यांनी केले.

ऑपरेशन सागर कवचचा विचका
सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पोलिसांतर्फे राबवण्यात आलेले ऑपरेशन सागर कवच हा निव्वळ विचका ठरला, असा ठपका श्री. पर्रीकर यांनी ठेवला. विविध ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याने सर्वांचीच गैरसोय झाली. सुरक्षेच्या समस्येवेळी परिस्थिती हाताळण्यास पोलिस सपशेल अपयशी ठरल्याचाच हा पुरावा आहे. या मोहिमेवेळी पोलिसांमध्ये अजिबात गांभीर्य दिसून येत नव्हते व त्यांना वाहतूक कोंडी सोडवण्यातही रस नव्हता, याचा अनुभव लोकांनी घेतला. कदाचित अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या मुंबई भेटीच्या अनुषंगानेच ही मोहीम राबवण्यात आली असावी, अशी शक्यता व्यक्त करताना गोवा पोलिसांच्या या सुरक्षा व्यवस्थेवर कितपत विश्वास ठेवावा, याचा विचार ओबामा यांना करावा लागेल, असा टोलाही त्यांनी हाणला.

No comments: