मडगाव, दि. २४ (प्रतिनिधी) - भारत -ऑस्ट्रलियामधील एक दिवसीय झटपट लढतीतील येथील फातोर्डा नेहरू स्टेडियमवरील सामना जरी काल पडलेल्या पावसामुळे होऊ शकलेला नसला तरी सामना होईल या आशेने आलेल्या अनेकांना आपले लक्ष्य बनविण्याचे काम मात्र तेथे त्याच हेतूने आलेल्या पाकिटमारांच्या टोळीने केले. मडगाव पोलिसात या प्रकरणी १५ ते १६ तक्रारी नोंदल्या गेलेल्या असल्या तरी नोंद न झालेल्यांचे प्रमाण कितीतरी पटीने असावे असा कयास आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीस गेलेल्यात भ्रमणध्वनींची संख्या अधिक आहे. सुमारे १४ भ्रमणध्वनी चोरीस गेल्याच्या तक्रारी नोंदल्या गेलेल्या आहेत, त्यात एका डॉक्टराने दोन दिवसांपूर्वीच खरेदी केलेल्या भ्रमणध्वनीचा समावेश असून त्याची किंमत १५ हजार रु. आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, कॅंटीनमध्ये गेल्यावेळी कुणीतरी त्याच्यावर कलंडल्यासारखे झाले व नंतर काही वेळाने भ्रमणध्वनी नसल्याचे लक्षात आले.
दवर्ली येथील प्रसाद नाईक याचा असाच २८ हजारांचा मोबाईल तर दिकरपाली येथील डी.जी.नाईक या बांधकाम ठेकेदाराचे एटीएम कार्ड, पॅन कार्ड, वाहतूक परवाना व अंगठीसाठी घेतलेले सुवर्ण नाणे व २८ हजार रोकड असलेले पाकीट व मोबाईल चोरीस गेला आहे. त्याशिवाय असंख्यांची पाकिटे पळविली गेलेली असून पोलिसांचा ससेमिरा नको, म्हणून ते पोेलिस तक्रारीच्या फंदांत पडलेले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय सामन्याच्यावेळी सर्रास असे प्रकार चालतात व फातोर्डा येथील या पूर्वींच्या सामन्यांच्या वेळीही सर्रास असे प्रकार झाले होते. परराज्यांतून या मोहिमेवर खास टोळ्या येतात व काम आटोपून लगेच पसार होतात.
पण यंदाचे आश्र्चर्य म्हणजे बहुतेक सर्व चोऱ्या स्टेडियममध्ये झालेल्या आहेत व त्यावरून चोरटे वा पाकिटमार तिकिटे काढून आतमध्ये गेले होत, हेच सिद्ध होते.
सर्व पोलिस बंदोबस्त स्टेडियमबाहेर कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी असेल हे हेरून चोरट्यांनी नवी शक्कल लढविली व आतमध्ये जेथे जास्त झुंबड उडते त्या जागा हेरून आपले काम साधले असे दिसते. भारत ऑस्ट्रेलियामधील लढत पाहण्यासाठी आलेल्यांवर मात्र सामना नाही तो नाही उलट आर्थिक फटका बसला, असे म्हणण्याची पाळी आली.
Monday 25 October, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment