पाडगावकरांच्या मतामुळे खळबळ
नवी दिल्ली, दि. २४ - काश्मीरात सुरु असलेला हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीचे निमंत्रक व ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांनी, काश्मीरप्रश्नी तोडगा काढायचा असेल तर पाकिस्तानलाही चर्चेत सहभागी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केल्याने प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने केंद्र सरकारवर कठोर टीका केली आहे. पंतप्रधानांनी दिलीप पाडगावकर यांनी व्यक्त केलेल्या मतासंबंधी आपले धोरण स्पष्ट करावे, अशी जोरदार मागणी आज भाजपने केली. भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.
काश्मीरात मागील अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरु आहे. हा हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्राने सर्व पक्षांशी चर्चा करण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे. त्या समितीचे निमंत्रक असलेल्या पाडगावकरांनी आपण पाकसंबंधी बोलून नवे काहीच सांगितलेले नाही, अशी भूमिका घेतली आहे. काश्मीर आता भारताचा अविभाज्य भाग असताना, तेथील शांतता प्रक्रियेत पाकला सहभागी करण्याची सूचना म्हणजे या प्रश्नाचे विनाकारण आंतरराष्ट्रीयीकरण असल्याची टीका त्यांनी केली. पाडगावकर यांनी व्यक्त केलेले मत हे हुरियतच्या मागणीला पुष्टी देणारे आहे, अशीही टीका त्यांनी केली. दरम्यान, पाडगावकर यांनी यासंबंधी बोलताना, पंतप्रधान अथवा गृहमंत्र्यांनी आपल्या कामाबाबत कोणत्याही सूचना केलेल्या नसल्याचे सांगताना आपण काश्मीरमधील घटना व त्यावरील उपाय याबाबत स्वतंत्र वृत्तीने अभ्यास करीत असल्याचे सांगितले.
Monday 25 October, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment