Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 28 November, 2008

मुंबईत दहशतकायम, अतिरेकी पाकिस्तानचे, १२५ ठार २८७ जखमी धुमश्चक्री सुरूच

मुंबई, दि. २७ : मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घेऊन दहशतवाद्यांनी बुधवारी रात्रीपासून सुरू केलेले बॉम्बहल्ले व अंदाधुंद गोळीबार आज दुसऱ्या दिवशीही कायम होता. आतापर्यंत दहशतवाद्यांनी १२५ जणांचा बळी घेतला आहे. त्यातील सहा विदेशी नागरिक व चौदा पोलिस आहेत. २८७ लोक जखमी झाले आहेत. सात दहशतवाद्यांचा मुडदा पाडण्यात, तर १० जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील ९ जण संशयित आहेत. संपूर्ण दक्षिण मुंबईच दहशतवाद्यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. परदेशातील नव्हे तर भारतातीलच दहशतवादी संघटनांनी दहशतवाद पसरविण्यासाठी मुंबईला प्रमुख केंद्र बनविले असल्याचे चित्र निर्माण करण्याचे या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला प्रयत्न पोलिसांनी सुरू केलेल्या शोध मोहिमेत फोल ठरला आहे. मुंबईत दोन दिवसांपासून सुरू असलेली चकमक पाकिस्तानी दहशतवाद्यांकडूनच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईत दहशत माजविण्यासाठी दहशतवाद्यांनी २० ते २५ वयोगटातील मुस्लिम युवकांची निवड केली आहे. मुंबईसह देशभरात दहशत माजविण्यासाठी दहशतवाद्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाच्या गुप्तचर यंत्रणेला आव्हान देत अतिशय योजनाबद्ध रितीने मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये प्रवेश केला. एकाचवेळी दहा ते पंधरा वेगवेगळी पथके तयार करून दहशतवाद्यांनी हे कारस्थान घडवून आणले आहेत. प्रारंभी हैदराबाद येथील डेक्कन मुजाहीद्दिन संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगण्यात आले. परंतु,
दहशतवादी पाकिस्तानातील असल्याचे स्पष्ट झाले असताना अजूनर्यंत पाकिस्तानातील कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
देशी-विदेशी लोकांचे मुख्य केंद्र असलेल्या दक्षिण मुंबईला दहशतवाद्यांनी आपले लक्ष बनविले. या भागातील हॉटेल ओबेराय, हॉटेल ताज, लिओपार्ड रेस्टो-बारसह छत्रपती शिवाजी टर्मिनस, विलेपार्ले, डॉकयार्ड रोड, कामा हॉस्पिटल, जी. टी. हॉस्पिटल, हॉटेल सेंटॉर, नरीमन हाऊस, छाबरा हाऊस येथे रात्री ९ ते १० या वेळात दहशतवाद्यांनी हल्ले करण्यास सुरूवात केली.
तुफानी गोळीबार करीत हॉटेल ताज, हॉटेल ओबेराय आपल्या ताब्यात घेणाऱ्या दहशतवाद्यांनी बुधवारी रात्रीपासून चालविलेला आतंक आज दुसऱ्यादिवशीही कायम होता. पंधरा मिनिट ते अर्ध्या तासाच्या फरकाने दहशतवादी हातबॉम्ब व गोळीबार करून पोलिस यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, "वेट ऍन्ड वॉच' ही भूमिका पोलिस यंत्रणेने स्वीकारल्याने दहशतवाद्यांकडून ह?े सुरूच होते.
ताजच्या प्रत्येक माळ्यावर मृतदेह!
दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री ९.१५ च्या सुमारास हॉटेल ताजमध्ये बेछूट गोळीबार करीत हॉटेलवर ताबा मिळविला. देशी-विदेशी नागरिकांनी ओलीस बनवून दहशतवाद्यांनी पोलिस यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालविला होता. यासाठी दहशतवाद्यांनी थोड्याथोड्यावेळाने एका-एकास शहीद करण्यास सुरूवात केली होती. २० मजली उंच असलेल्या ताज इंटरनॅशनलमध्ये ८०० खोल्या आहेत. प्रत्येक मजल्यावर एक ते दोन मृतदेह असे दृश्य असून सर्वत्र रक्तांचा सडा पडलेला आहे. हॉटेल्समधून जखमींना बाहेर काढताना एका मागे एक रुग्णवाहिका तयार ठेवण्यात येत होती. गोळीबार किंवा हातबॉम्बचा स्फोट होताच एक किंवा दोघांना रुग्णवाहिकेत टाकून रुग्णालयात हलविण्यात येत होते. हॉटेल ताजपासून अंदाजे २५० ते ३०० फुटापर्यंत प्रवेश बंदी घालण्यात आली होती. हीच स्थिती हॉटेल्स ओबेराय, नरीमन हाऊस आणि छाबरा हाऊसमध्ये होती. चारही बाजुंनीे चेहरा दिसावा एवढी चकाकणारी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्स दोन दिवसांपासून रक्ताने माखलेली असून सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे.
चार खासदारही ओलीस
ॉटेल ताजमध्ये दहशतवादी घुसले त्यावेळी चार खासदार हॉटेलमध्ये होते. यात बीडचे खा. जयसिंगराव गायकवाड यांच्यासह महाराष्ट्राबाहेरील नेत्यांचा समावेश आहे. त्यांना दीड तासपर्यंत ओलिस धरून ठेवण्यात आले होते. पण पोलिसांनी त्यांना मागच्या दाराने सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. एका महत्वाच्या बैठकीसाठी हे खासदार एकत्रित आले होते. बैठकीनंतर काही खासदार निघून गेलेत. हे चार खासदारही थोड्या वेळाने बाहेर पडणार होते. परंतु, त्याचवेळी दहशतवाद्यांनी आतमध्ये प्रवेश केला.
गोळीबार, हातबॉम्ब व आगडोंब
हॉटेल ताज व हॉटेल ओबेराय ताब्यात घेतल्यानंतर दहशतवाद्यांनी वारंवार गोळीबार करीत आहेत. हात बॉम्ब फोडून आतंक माजविण्यात येत आहे. तर आतमध्ये आग लावून अत्याधुनिक शस्त्रांनी स?ा झालेल्या पोलिस यंत्रणेचे मनोधैर्य खचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सकाळी ११ च्या सुमारास ताजच्या वरच्या मजल्यावरील खोलीत आग लावण्यात आली. नंतर दिवसभरात सात ते आठवेळा आग लावली गेली. सायंकाळी ५ च्या सुमारास चौथ्या माळ्यावर आग लावून दहशतवाद्यांनी दहशत माजविली. परंतु, ओलीसांना सुरक्षित बाहेर काढून अतिरेक्यांना अटक करणे किंवा त्यांना ठार करण्याची तयारी पोलिसांनी केल्याने दहशतवाद्यांकडून वारंवार पसरविण्यात येणारी दहशत अपयशी ठरल्यागत दिसत होती.

No comments: