Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 29 November, 2008

ओळख पटवल्याखेरीज कोणाला खोल्या देऊ नये हॉटेल्सना जिल्हाधिकाऱ्यांचा सक्त आदेश

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): मुंबई येथील दोन पंचतारांकित हॉटेलांत दहशतवाद्यांनी थैमान घातले आहे. तथापि, असे असले तरी गोव्याला नेहमीप्रमाणे नववर्ष साजरे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देणार असून खबरदारीचा उपाय म्हणून "ओळख पटल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला किंवा पाहुण्याला खोली उपलब्ध करून देऊ नका', अशा सक्तीचा आदेश आज उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. तो ३० नोव्हेंबर ते २८ जानेवारी ०९ पर्यत लागू असेल.
मुंबईत सुरू असलेल्या रक्तरंजित नाट्यातील दहशतवादी हे हॉटेल ताजमध्ये काही दिवसापूर्वी येऊन राहिल्याचे उघड झाल्याने आणि यापूर्वी दोन दहशतवाद्यांनी गोव्यातील एका लॉजमधे थांबून काही जागेची टेहळणी केल्याचे यापूर्वी उघड झाल्याने यावेळी प्रशासनाने हा मुद्दा गांर्भींयाने घेतला आहे. "उत्तर गोव्यातील सर्व हॉटेल्स, लॉजिंग-बोर्डिंग, खाजगी गेस्ट हाउस, धार्मिक संस्थांची पेइंग गेस्ट हाऊसचे मालक व व्यवस्थापनांनी कोणत्याही व्यक्तीची पाहुण्याची ओळख पटल्याशिवाय आत प्रवेश देऊ नये, असे आदेशात म्हटले आहे.
तसेच पर्यटक किंवा पाहुणे म्हणून राहण्यास येणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिस यंत्रणेला तपासणीसाठी उपलब्ध करावी, असेही या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, मुंबईत दहशतवाद्यांनी विदेशी पर्यटकांना लक्ष केल्याने गोव्यातही पर्यटनस्थळी आणि सागरी पट्ट्यात सुरक्षेचे कडक उपाय योजण्यात आले आहेत.

No comments: