Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 17 December, 2008

पर्यटनावरील सावट दूर होण्याचे संकेत

नाताळ, नववर्षानिमित्त पर्यटकांचा ओघ सुरू
पणजी,दि.१७(प्रतिनिधी)ः नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील पर्यटकांची संख्या वाढत चालल्याने व पर्यटन उद्योगाला नव्याने उभारी मिळाल्याने गोवा ट्रॅव्हल अँड टूरीझम उद्योग समूहाने आनंद व्यक्त केला आहे.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गोवा ट्रॅव्हल अँड टूरीझम प्राधिकरणाचे अध्यक्ष राल्फ डिसोझा, पर्यटन खात्याचे संचालक एल्वीस गोम्स व चार्ल्स बोनाफिसायो आदी पदाधिकारी हजर होते. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला व जागतिक मंदीचा फटका गोव्याच्या पर्यटन मोसमावर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मुंबई हल्ल्यामुळे तर अनेक बुकिंगही रद्द झाल्याने यंदा पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, सुदैवाने परिस्थिती सुधारत असून पुन्हा एकदा पर्यटकांचा ओघ सुरू होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दहशतवादी हल्ल्यापेक्षा आर्थिक मंदीमुळे विदेशी पर्यटकांची संख्या रोडावल्याचे यावेळी सांगण्यात आले. गोवा सरकारने सुरक्षेच्याबाबतीत कडक उपाययोजना आखल्या आहेत तर विविध हॉटेलांनीही आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेखातर आवश्यक उपाययोजना आखल्याने गोवा हे सुरक्षित पर्यटनस्थळ असल्याचा संदेश पसरण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. नाताळ व नववर्षानिमित्ताने आयोजित नृत्य रजनी व संगीताचे कार्यक्रम यंदाही त्याच जोशात होणार आहेत. या काळात किनारी भागातील हॉटेल्स बंद असतील अशी अफवा पसरली असून त्यात तथ्य नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यंदा हॉटेलच्या दरातही किंचित बदल झाला असून काही प्रमाणात दर कमी झाल्याचेही सांगण्यात आले. पर्यटकांसाठी विविध पॅकेज तयार करण्यात आल्याने हेच पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. अलीकडेच ब्रिटनच्या महाराणी येथे फिरण्यासाठी आल्या होत्या व त्यांनी गोव्याच्या सुरक्षित पर्यटनाचे कौतुक केल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी सिदाद दी गोवाच्या निता सेन यांनी सांगितले की यंदा चार्टर विमान रद्द झाल्याची एकही घटना घडली नाही. सध्याच्या परिस्थितीत ८० टक्के बुकिंग सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. देशी पर्यटकांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे विनय आल्बूकर्क म्हणाले तर इतरांनी पर्यटन मोसम पुन्हा सक्रिय होत असल्याचे समाधान व्यक्त केले.सतीश प्रभू यांनी दहशतवादापेक्षा जागतिक मंदीचा फटका जास्त बसल्याचे सांगितले.

No comments: