Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 14 December, 2008

हत्तीच्या उच्छादानंतरही लोकप्रतिनिधी ढिम्मच

चांदेलवासीय खवळले
मोरजी, दि. १३ (वार्ताहर) - पेडणे तालुक्यातील चांदेल परिसरात गेल्या १० दिवसांपासून हत्तीने उच्छाद मांडूनही लोकप्रतिनिधींनी त्या भागाला साधी भेटही देण्याचे सौजन्य न दाखवल्याने चांदेलवासीय खवळले आहेत.
हत्तीने बागायतीची मोठ्या प्रमाणात नुकसानी केल्यावर आता तो लोकवस्तीत घुसत आहे. त्या हत्तीचा जर बंदोबस्त केला नाही तर शेतकऱ्यांसमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, अशी संताप्त प्रतिक्रिया लोकांतून व्यक्त होत आहे.
हत्ती चांदेल भागात येऊन केळी, कवाथे व अंगणात ठेवलेल्या भाताची उडवी फस्त करत आहे. त्यामुळे लाखों रुपयांची नुकसानी झाली व होत आहे. तरीसुद्धा आजपर्यंत या भागाचे आमदार तथा पंचायतमंत्री व पालकमंत्री बाबू आजगावकर यांनी हानीग्रस्त भागाला का भेट दिली नाही, असा सवाल चांदेल कुंभारवाड्यावरील शेतकऱ्यांनी केला आहे. निवडणुकीवेळी वारंवार घिरट्या घालणारे उमेदवार व आमदार निवडून आल्यानंतर का पाठ फिरवतात, हे कळत नाही. निदान या बाबतीत तरी त्यांनी पक्षीय राजकारण करू नये. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी याची दखल घेऊन शेतकऱ्यांना हत्तींपासून सुरक्षा दिली नाही तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहणार नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. हत्तीचा शासनाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कुंभारवाडा चांदेल येथील शेतकऱ्यांनी सांगितले की, हत्ती आता लोकवस्तीत घुसत असल्याने तो लोकांचे बळी गेल्यास त्याला जबाबदार कोण, याचे उत्तर सरकारने द्यावे.
दरम्यान, तुये विभागीय वनाधिकारी एस्. आर. प्रभू यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारसमोर एक योजना मांडली आहे. त्या योजनेला केंद्र सरकारची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. तसे झाल्यास पुढील कार्यवाही तातडीने करता येईल. या हत्तीला गुंगी देऊन क्रेनद्वारे ट्रकात घालून अभयारण्यात नेण्याची ही तिला केंद्राकडून मंजुरी मिळाल्याशिवाय वनखातेही काहीच करू शकत नाही.
चांदेल भागातील स्थानिक लोक हत्ती आल्यानंतर गर्दी करतात, खात असताना जर हत्तीला अडथळा आणला तर तो अंगावर धावून येतो. लोकांनी आता हत्तीच्या मागे मागे पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे प्रभू यांनी आवाहन केले व हत्तींची जबाबदारी वनखात्यावर सोपवावी असे म्हटले आहे.
हत्तीला पकडून न्या ः मळीक
गेले दहा दिवस हत्ती चांदेल परिसरात नुकसान करत करत आता लोकवस्तीतही मोर्चा वळवत असल्याने भविष्यात लोकांच्या घरात घुसून दुर्घटना घडण्यापूर्वी हत्तीला पकडून सरकारने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी चांदेलचे माजी सरपंच संतोष मळीक व कदंब महामंडळाचे संचालक दशरथ महाले यांनी केली आहे. चांदेल येथील प्रकाश च्यारी व श्री. गवस यांनी हत्तींची एवढी धास्ती घेतली आहे की ते रात्री आपल्या घरात न झोपता नातेवाइकांकडे दूरच्या ठिकाणी जाऊन झोपतात.

No comments: