Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 19 December, 2008

जागा ८ व अर्ज ६००, मुलाखतींचा 'फार्स' सुरू

पणजी, दि.१८(प्रतिनिधी): राज्याच्या शिक्षण खात्यात शिपायांच्या आठ जागांसाठी सुमारे सहाशे अर्ज आले असून त्यामुळे गोव्यात रोजगारीची समस्या कशी भीषण बनली आहे यावर झगझगीत प्रकाश पडला आहे. शिवाय ही पदे कशी भरायची हे आधीच ठरून गेल्याने सध्या मुलाखतींचा फार्स सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
विविध सरकारी खात्यातील पदे ही केवळ राजकीय वशिलेबाजीने भरली जातात हे अमान्य करण्याचे धाडस कुणीही करणार नाही. या वशिलेबाजीला कायदेशीर स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी राज्यातील बेरोजगारांची जी फजिती केली जाते त्यामुळे सरकारी "सिस्टीम' कशी नाटकी आहे याची प्रचिती नागरीकांना पावलोपावली येत आहे.
शिक्षण खात्यातर्फे गेल्याच महिन्यात सुमारे ११० शिक्षकांची भरती करण्यात आली. या यादीत निवड झालेले उमेदवार हे आपल्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा राजकीय वजनाच्या बळावर जास्त पात्र ठरले आहेत. आता खात्यातर्फे ८ शिपायांची पदे जाहीर झाली आहेत. या पदांसाठी कमी शिक्षणाची गरज असल्याने व या गटातील उमेदवारांना अन्य ठिकाणी नोकरी मिळणे कठीण असल्याने या आठ पदांसाठी खात्याकडे सुमारे ६०० अर्ज सादर झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.सरकारी खात्यात सर्वांत कमी शिक्षणासाठी असलेला हा एकमेव पर्याय त्यामुळे राज्यभरातील कमी शिक्षित गटातील बेरोजगारांनी या पदांसाठी अर्ज केले आहेत. मुळात या ८ पदांवर कोणाची निवड होणार याची नावे संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना यापूर्वीच कळली असतील; परंतु तरीही ही निवड किती पारदर्शकतेने केली जाते व पात्रतेच्या निकषावरच ही निवड होते हे भासवण्यासाठी या असंख्य बेरोजगारांचा छळच जणू सरकारकडून सुरू आहे. या उमेदवारांना केवळ निमित्तमात्र प्रश्न विचारून अधिकारी आपली जबाबदारी पार पाडीत असले तरी या मुलाखतींना सामोरे जाणारे बिचारे उमेदवार आपल्याला नोकरी मिळेल, अशी वेडी आशा लावून बसले आहेत.
राज्यातील अशा कमी शिक्षण घेतलेल्या स्थानिक बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कंत्राटी कामगार भरती सोसायटीची स्थापना केली होती व मोठ्या संख्येतील या घटकाला विविध संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. गोमंतकीय युवकांना योग्य मोबदला व व्यवस्थित काम दिल्यास कोणतेही काम करण्याची त्यांची तयारी असते हे या सोसायटीने सिद्ध करून दाखवले होते. झाडूवाली व सुरक्षा रक्षकाची कामेही गोमंतकीय करू शकतात हे यावरून सिद्धही झाले होते; परंतु केवळ राजकीय आकसापोटी पर्रीकरांच्या विरोधकांनी या सोसायटीला वाऱ्यावर सोडले व असंख्य गोमंतकीयांच्या पोटावर नांगर फिरवून त्यांच्या ठिकाणी बिगर गोमंतकीयांची भरती केली. सरकारी खात्यातील नोकर भरतीबाबत सुरू असलेली ही प्रक्रिया खरोखरच सुधारण्याची गरज असून ही प्रक्रिया म्हणजे निव्वळ फजिती असल्याने ती तात्काळ बंद होण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

No comments: